नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी “ऑरेंज अलर्ट” दिला आहे.राज्यातील हवामानात अनपेक्षित असे बदल घडून येत आहेत. यंदा उन्हाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे महिनाभर आधी झाली. त्यानंतर मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आणि आता तापमान सर्वोच्च पातळीवर असण्याची वेळ असताना अवकाळी पावसाचा मारा सुरु झाला आहे.

मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि वेग देखील वाढलेला आहे. त्यामुळे वातावरणात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात गारपीटीसह पावसाने हजेरी लावली आहे. तर आताही पावसाचे सावट कायम आहे. विदर्भात काही जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून विजेच्या कडकडासह तुरळक आणि सामान्य पावसाची नोंद झालेली आहे. पुढील दोन दिवस विदर्भात आकाशात ढग दाटलेली असतील. मात्र, बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्हात मुसळधार पाऊसाची दाट शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. ‘मे’ महिन्यात नागपूर आणि विदर्भात उचांक्की तापमानाची नोंद असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी तो मार्च, एप्रिल महिन्यातच नोंदवला गेला. तापमान जवळजवळ ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र, यंदा हवामानात कमालीचा बदल झालेला दिसतोय. गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानात देखील घट नोंदवण्यात आली आहे. विदर्भातील जिल्ह्याचे तापमान सामान्यपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने खाली आले आहे. एरवी मे महिन्यात विदर्भात सरासरी तापमान हे ४५ ते ४७ डिग्रीपर्यंत जाते. मात्र, वातावरणात बदल झाल्यामुळे तापमानाचा पारा सामान्य तापमानापेक्षा खाली आलेला आहे. उष्ण वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. त्यामुले मुसळधार पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. गेल्या पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण पुढील आठवडाभर कायम राहणार आहे, असे नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऊन आणि उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.