प्रिय मनीषा, तुझ्या मृत्यूबद्दल केवळ तुझ्या वडिलांना दोषी ठरवता येणार नाही. ज्या सन्मानासाठी त्यांनी तुझी हत्या केली तो सन्मान ज्या व्यवस्थेतून जन्मला त्यालाही दोषी ठरवणे भाग आहे. या अर्थाने केवळ तुझे वडीलच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे ठाकत नाहीत तर सारी व्यवस्थाच उभी ठाकते. त्यामुळे आम्हा सर्वाना माफ कर असे म्हणायची वेळ या प्रसंगाने आणली आहे. तरुण वयात कुणावर प्रेम करणे, त्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्ने रंगवणे हे तसे नैसर्गिकच. तुझ्या वडिलांच्या दृष्टीने तो गुन्हा असला तरी प्रत्यक्षात तू कुठलाच गुन्हा केला नव्हता. प्रेम करण्याचा, त्याला अनुसरून लग्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो तुलाही होता. तो अधिकार तू वापरला आणि सन्मानासाठी हत्या या वाईट प्रकाराचा तू बळी ठरली. तुझ्या वडिलांच्या दृष्टीने तो सन्मान असला तरी तो किती फुकाचा आहे हे सारे सुजाण जाणतात. प्रेम करण्यासाठी तू परजातीतला तरुण निवडला हाही तुझा दोष नाही. प्रेम जातपात, धर्म पाहून होत नसते. हे जातीपातीचे अडथळे समाजाने निर्माण केले आहे. तोच चष्मा तुझ्या वडिलांनी घातला. आम्ही समाजाच्या प्रगतीच्या गोष्टी करतो. ही प्रगती सर्व स्तरापर्यंत पोहोचली आहे असा दावा करतो, पण प्रगतीचा हा फुगा किती तकलादू आहे हे तुझ्या मृत्यूने साऱ्यांना दाखवून दिले आहे. आपल्या समाजव्यवस्थेत जातीची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की व्यक्तिगत पातळीवर अजूनही त्याच विचाराला प्राधान्य देण्याची प्रथा अनेक घरात आढळते. तुझेही घर त्याला अपवाद ठरू शकले नाही. घरात चार भावंडं, त्यांचे शिक्षण, शेतीचा एक तुकडा व परंपरागत असलेला मेंढपाळाचा व्यवसाय हेच आयुष्य बघत तू मोठी झाली. घरच्या परिस्थितीमुळे फारसे शिक्षणही तू घेऊ शकली नाही, तरीही तुझा विचार जुनाट परंपरा व रूढींना थारा देणारा अजिबात नव्हता. घरच्यांनी तुझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केल्यावर तू स्पष्टपणे प्रेमाची कबुली दिली. तू शोधलेला जोडीदार सुद्धा कुणी उडाणटप्पू नव्हता. तोही नोकरी करून जगणारा होता. तरीही केवळ परजातीतला या एका कारणासाठी घरात तुझ्या प्रेमाचा विरोध झाला. तुझ्या घरच्यांनी जातीतला मुलगा शोधला, परस्पर लग्न ठरवले तेव्हा तू विष घेतले. त्यातूनही तू वाचली पण वडिलांचा विरोध कायम राहिला. काहीही केले तरी ऐकत नाही हे बघून तू पळून गेली व लग्न केले. अशा प्रकरणात काही दिवसानंतर घरच्यांचा विरोध मावळतो असे अनेक अनुभव गाठीशी असल्याने तू निर्धास्त राहिली. यातून आलेली गाफीलता थेट तुझ्या जीवावर उठली. कुठल्याही संसारात सुख महत्त्वाचे. आता ते आपल्याला मिळेल अशी आशा तू बाळगून होती, पण खुद्द तुझ्या वडिलांनीच ती फोल ठरवली. घरातील शेळ्यामेंढय़ांना चारा तोडण्यासाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड तू लहानपणापासून बघत आलेली. तीच कुहाड एके दिवशी आपल्याही जीवावर उठेल, याचा स्वप्नातही विचार तू केला नसशील, पण प्रत्यक्षात नको तेच घडले. प्रगतीच्या गप्पा करणारे ‘जातीव्यवस्था झुगारा’ असे सतत सांगत असतात. प्रत्यक्षात समाजातले किती जण ही व्यवस्था तोडण्यात सहभागी होतात हा आजही कळीचा प्रश्न आहे. जातीव्यवस्था तोडणाऱ्यांची संख्या आजही कमी आहे. याचा विचार केला तर तू अल्पसंख्य गटात मोडणारी होती. प्रेमासाठी का होईना पण तू ते तोडण्याचे धाडस दाखवले. त्याची जबर शिक्षा तुला भोगावी लागली. आजही कायद्याच्या दृष्टीने तुझे वडील भलेही आरोपी असतील पण रूढी, परंपरा व जातीच्या बेडय़ात अडकलेल्या अनेक घरात तुझ्या वडिलांनी केले ते योग्यच अशी चर्चा नक्की चालू असेल. पाठीशी आणखी एक बहीण लग्नाची असताना तू धाडस केले. त्या बहिणीच्या लग्नात अडथळे आल्यावर मग वडिलांनी काय केले असते. ते कुणाकडे गेले असते, असा युक्तिवाद या चर्चामधून जरूर होत असेल. या चर्चा व असले युक्तिवाद वायफळ आहेत हे आम्ही अजूनही घराघरात पोहचवू शकलो नाही, हे आमचे अपयश आहे मनीषा! काही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्य़ातील माणिकगड पहाडावर राहणाऱ्या आदिवासी समाजातही असाच प्रकार घडला. तुझ्याप्रमाणेच त्याही मुलीने पळून जाऊन लग्न केले. याला विरोध म्हणून अख्ख्या समाजाने या मुलीच्या आईला वाळीत टाकले. सामाजिक बहिष्कारामुळे ही आई हादरून गेली. प्रकरण काही सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले. त्यांनी समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण बुरसट विचारसरणी सोडायला कुणी तयार होईना. अखेर बहिष्कार परत घ्यायचा असेल तर दंड भरून तो घेता येतो असा तोडगा निघाला. हा दंड कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून भरला व निर्माण झालेल्या पेचातून नवपरिणितांची सुटका केली. तुझ्या वडिलांना बहिष्काराची भीती होती की नाही हे आता कळायला मार्ग नाही, पण त्यांनी थेट शेवटचा व अंतिम पर्याय मात्र निवडला. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, अशा जोडप्यांना आर्थिक मदत करणे असे अनेक उपायांचे ढोल सरकारदरबारी नेहमी वाजत असतात. अशा जोडप्यांना तातडीने संरक्षण द्यावे, असेही निर्देश पोलीस यंत्रणेला वेळोवेळी मिळत असतात. मात्र, यापैकी एकही उपाय तुझा जीव वाचवू शकला नाही. आजही अनेक घरात अशी प्रकरणे उद्भवतात पण त्यात मध्यस्थी करण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. मदत मागितली तर मिळेल असाच साऱ्यांचा अविर्भाव असतो. तू व तुझ्या पतीने सारे काही ठीक होईल, या आशेवर अशा कोणत्याही यंत्रणेकडे जाण्याचे टाळले. मुलगी आणि वडिलांचे नाते अधिक गहिरे असते असे म्हणतात. याच बळावर वडिलांची समजूत काढू, अशी आशा तू नक्की बाळगली असशील. कोणतीही नवविवाहिता घराचे दार वाजले की पती आले असतील हीच अपेक्षा बाळगून असते. त्याच अपेक्षेने तू दार उघडले असशील. समोर वडील बघून व त्यांच्या हातातले शस्त्र बघून तुझ्या मनात एका क्षणात किती अनंत विचार तरळले असतील, याची साधी कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. आता तर तू व्यक्त होण्यापलीकडे निघून गेली आहे मनीषा! सुदृढ समाजाची निर्मिती आम्ही करू शकलो नाही अशी खंत जागवणारा मृत्यू तू देऊन गेली, म्हणूनच आम्हाला माफ कर मनीषा!
devendra.gawande@expressindia.com