नागपूर : जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मनसर परिसरात मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन व्यवसाय केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मगरीने या व्यवसायावर संक्रांत आणली होती. दोन दिवसांपूर्वी या मगरीला वनखात्याने जेरबंद केले आणि मत्स्यपालन व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
मनसर परिसरात अनेक खासगी तलाव आहेत, ज्यात मत्स्यपालन व्यवसाय केला जातो. हे तलाव फार मोठे नसल्याने याठिकाणी मगर असू शकेल अशी कल्पनाही कुणी केलेली नव्हती. मात्र, तलावातील मासे गायब होत होते. हे मासे गायब का होतात, याचा शोध घेतल्यानंतर त्याठिकाणी तलावात मगरीने वास्तव्य आढळून आले. गेल्या तीन-चार वर्षांपासून हा प्रकार त्याठिकाणी सुरू होता. त्याठिकाणी मगर आहे हे लक्षात आल्यानंतर वनखात्याला सूचनाही देण्यात आली आणि खात्याचे अधिकारी त्याठिकाणी गेले, पण मगरीचा थांगपत्ता काही लागला नाही.
एकदाचे वाघ पकडणे सोपे, पण मगरीला जेरबंद करणे हे अतिशय जोखमीचे काम आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्याठिकाणी मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना मगर दिसली आणि त्यांनी नागपूर वनखात्याला सूचना दिली. यावेळी मात्र, मगरीनेच वनखात्याला तिला पकडण्यासाठी संधी दिली. मत्स्यपालन व्यावसायिक तलावातून मासे काढत असताना मासेमारीच्या जाळ्यत मास्यांसोबत मगरही अडकल्याने त्यांना दिसून आले. मत्स्यपालन तलावातून एका मगरीची सुटका करण्यात आली. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मनसरजवळ काही लोकांचे मत्स्यपालन तलाव आहेत. तिथे मगरी असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून वन विभागाकडे केल्या जात होत्या. वन विभागाचे पथक अनेक वेळा गेले, पण मगर सापडली नाही.
रविवारी, माशासोबत एक मगरही जाळ्यात अडकली. माहिती मिळताच, जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या सूचनेनुसार, रामटेक आणि पेंच येथील वन कर्मचाऱ्याचे पथक त्याठिकाणी गेले. पथकाने मगरीची सुटका केली आणि एका मोठ्या तलावात त्या मगरीला सोडले. त्यानंतर मत्स्यपालन व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला. गेल्या तीन वर्षांपासून या मगरीने या व्यावसायिकांना हैराण केले होते. त्यांच्या व्यवसायावर संकट आणले होते. मात्र, अखेर ही मगर जेरबंद करून दुसरीकडे सोडण्यात आली.