नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू त्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी काँग्रेसची देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या बच्चू कडू यांना आमचा पाठिंबा आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ते आज नागपूर निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

एकीकडे राज्यात लाखोचे कोटींचे प्रकल्प होत आहेत, मुंबईतील जमीन एका उद्योजकाला देण्यात येतात, मग शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला दिसत नाही का? शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफी याबाबत समिती नेमणार असे सरकार कडून सांगण्यात येत आहे. पण निवडणुकीत मात्र कर्जमाफी देऊ, शेतमालाला हमीभाव देऊ, बोनस देऊ अशी आश्वासन दिली होती. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे असे असताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे. त्याऐवजी समिती नेमून सरकार पुन्हा एकदा धूळफेक करत आहे. समिती नेमण्यापेक्षा सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केलेली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला होता. आता मात्र चुकीची धोरणे आणि खोटी आश्वासन यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. सरकार शेतकरी आणि शेतमजूर यांना वाऱ्यावर सोडत आहे. सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासन पूर्ण करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत ठोस कारवाई करावी,पुन्हा आश्वासन देऊ नये असे वडेट्टीवार म्हणाले.