लोकसत्ता टीम

नागपूर : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आणि भाजप यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. भाजपमुळेच त्यांना गृहमंत्रीपद सोडावे लागले, तुरूंगात जावे लागले, त्यांच्या निवासस्थानी डी, सीबीआयचे छापे पडले. पण यातून काहीच हाती लागले नाही. न्यायालयाने त्यांना जामीन देताना तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले. मात्र या सर्व प्रकरणात अनिल देशमुख यांना अत्यंत कठीण मानसिक यातनांमधून जावे लागले. त्यामुळे देशमुख यांच्यासाठी भाजप क्रमांक एकचा शत्रूपक्ष ठरतो. या सर्व पार्श्वभूमीवर देशमुख पुत्र व नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी अलीकडेच भाजप नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धन्यवाद देणारे ट्वीट केले. या ट्वीटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राजकारणात कोढणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हणतात. पण आताचे राजकारण कोणासोबत मैत्री किंवा शत्रूता करण्या इतकेही लायक उरले नाही. इतका गढूळपणा त्यात आला आहे. अनिल देशमुख प्रकरणात हेच दिसून आले. त्यामुळे त्याचे पुत्र सलील यांनी भाजप मंत्र्यांचे आभार मानावे असे काय झाले? भाजपचा अनिल देशमुख यांच्याविरुद्धचा राग संपला की देशमुखांनी भाजपला माफ केले? असे अनेक प्रश्न सलील यांच्या ट्विटने निर्माण केले. पण आभार ट्विटचे खरे कारण आता पुढे आले आहे.

आणखी वाचा-बच्चू कडूंच्या मोर्चासाठी महिलांची दिशाभूल; सहलीसाठी नेत असल्याचे…

अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात केदारपूर येथे ४ कोटी ५० लाख रुपयाचा साहसी क्रीडा केंद्र व वनपर्यटनासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यापैकी पहीला हप्ता २ कोटी 3० लाख रुपये मंजूर करण्यात आला.आता लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे .वन पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सलील देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना केदारपूर येथील जागेची पाहणी केली. यावेळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुध्दा उपस्थित होते.

४ कोटी ५० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती जिल्हा नियोजन समितीला करण्यात आली होती. परंतु भाजपचे वर्चस्व असलेल्या जिल्हा नियोजन समीतीने यासाठी कोणताही निधी दिला नव्हता. यासंदर्भात सलील देशमुख यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. त्यांना निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. यानंतर सलील देशमुख यांनी पाठपुरवा सुरुच ठेवला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे अनेक वेळा बैठका घेतल्या. अखेर २ कोटी ३० लाख रुपयाचा पहिला हप्ता मिळाला. दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी सुध्दा सलील देशमुख यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे.

आणखी वाचा-‘नीट’परीक्षेसाठी ‘एनसीईआरटी’ची पुस्तके वाचायची की नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे ट्वीट..

काटोल तालुक्यातील केदारपूर येथील साहसी क्रीडा केंद्र व वनपर्यटनाच्या कामासाठी निधी मंजुर केल्याबदल सलील देशमुख यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. धन्यवाद, सुधीरभाऊ मुनगंटीवार! आपण काटोल तालुक्यातील केदारपुर येथे पर्यंटन विकासासाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले. कटकारस्थान न करता, संकुचीत विचार न करता मोठ्या मनाने हा निधी आपण उपलब्ध करुन दिलात. आज महाराष्ट्रातील राजकारणात जो गलिच्छपणा आला आहे त्याला आपण छेद दिलात. गेल्या अनेक दिवसांपासून आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल काटोलच्या जनतेच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार! असे ट्विट सलील यांनी केले