नागपूर: महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या हलबा समाजाच्या आरक्षणावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या हलबा समाजाला आजपर्यंत आरक्षण का मिळाले नाही? त्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील हलबा समाज महासंघाच्या समारंभात भाष्य केले आहे. नितीन गडकरी नेमके काय म्हणाले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
हलबा समाज महासंघाच्या दिनदयाल नगर येथील सांस्कृतिक भवनात झालेल्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी आमदार विकास कुंभारे, हलबा समाज महासंघाचे अध्यक्ष डॉ. देवराम नंदनवार, महासचिव डॉ. रमेश पराते उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, हलबा समाजाच्या आरक्षणासाठी मागील अनेक वर्षांपासून मी स्वत: प्रयत्न करत आहोत. परंतु उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयासह इतर तांत्रिक कारणांनी अडचणी आल्या.
या आरक्षणासाठीचा संघर्ष आपण कायम ठेऊ. परंतु समाजाच्या विकासासाठी कृती आराखडाही महत्वाचा आहे, असेही गडकरी म्हणाले. हलबा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबई, दिल्लीत अनेक बैठकी झाल्या. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना अरून जेटली विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. मुखर्जी यांनी बरीच मदतही केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला. आताही आपण आरक्षणाच्या प्रश्नावर प्रयत्न करत असलो तरी समाज बांधवांचा विकासही महत्वाचा असल्याचे गडकरी म्हणाले.
विकासासाठी शिक्षण हा सर्वांत मोठा दुवा….
समाजातील मोठ्या पदावरील लोकांनी पुढे येऊन इतरांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विकासासाठी शिक्षण हा सर्वांत मोठा दुवा आहे. हलबा समाजाने आपल्या समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला, पण शिक्षणाची कास धरली त्यामुळेच समाजातील अनेक लोक मोठ्या पदांपर्यंत पोहोचले. अनेकांनी उद्योग क्षेत्रात नाव कमावले. पुढेही शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग गवसणार आहे. हलबा समाजाचा उदरनिर्वाह पूर्वी हातमागावर होता. माझ्या धापेवाडा गावासह बेला, खापा येथे हलबा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. पण, हातमागाचा व्यवसाय संपुष्टात आला. समाजाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर मुलांना चांगले शिक्षण देतानाच त्यांच्यातील उद्यमशीलता वाढवावी. त्यातूनच आर्थिक प्रगती होईल, असेही गडकरी म्हणाले.
हलबा समाजाने तयार केलेली साडी हेमा मालीनी घालणार…
हलबा समाज हातमाग व पावरलुमच्या साड्यांसाठी प्रसिद्ध होते. ही ओळख पून्हा निर्माण करण्यासाठी धापेवाडा येथे धापेवाडा टेक्सटाईल नावाने हातमाग व पाॅवरलूमचा कारखान्यावर काम सुरू आहे. येथे तयार साड्यांवर झारखंड येथे प्रिंटचे काम केले गेले. त्यामुळे ही साडी इतकी सुंदर झाली की त्याला सर्वत्र मागणी वाढली आहे. धापेवाडात हलबा बांधवांनी तयार केलेली साडी परिधान करूनच यायला अभिनेत्री हेमा मालिनी यांना विनंती केली आहे. त्यामुळे आपोवार या साडीची मार्केटिंग होईल, असेही गडकरी म्हणाले.