Pahalgam Terror Attack Updates Today: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर, हिमाचल व उत्तराखंड येथील विमान, रेल्वे तिकीट, हॉटेल व चारचाकी वाहनांचे आरक्षण रद्द करण्याचा सपाटा शेकडो पर्यटकांनी सुरू केला आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ ते २० टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

एप्रिल व मे महिन्यातील तीव्र उन्हाळा बघता या जिल्ह्यातील अनेक पर्यटकांनी थंड हवेचे ठिकाण असलेल्या जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड तसेच लेह लद्दाक येथील विमान, रेल्वे, हॉटेल तसेच चार चाकी वाहनांचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता पर्यटकांनी आरक्षण रद्द करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे टूर ॲन्ड ट्रॅव्हल्स कंपनी व एजंटला एका दिवसाला लाखोंचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

येथील स्वामी हॉलिडेचे संतोष तेलंग यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे जम्मू काश्मीर येथे आठ ते दहा टूरचे आरक्षण झाले होते. तसेच मे महिन्यातील विमान, रेल्वे व हॉटेलचे आरक्षण देखील करून ठेवले होते. मात्र आता या हल्ल्यानंतर पर्यटकांनी स्प्ष्ट नकार दिल्याने शेकडो पर्यटकांचे अगोदर करून ठेवलेले आरक्षण रद्द करावे लागत आहूे. त्यामुळे किमान दहा ते बारा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.

पहल व्हॅकेशनचे अनिल चव्हाण यांनी एप्रिल महिन्यात काश्मीर येथे १०० पर्यटकांचा टूर आयोजित केला होता. मात्र आता या हल्ल्यानंतर त्यांनाही टूर रद्द करावा लागत आहे. त्याचा परिमणाम विमान, रेल्वे, हॉटेल तसेच काश्मीर येथील हाऊस बोट व अन्य बुकींग रद्द कराव्या लागल्या आहेत. काही बुकींगचे पूर्ण पैसे भरण्यात आलेले आहे. मात्र आता तेथील हॉटेल संचालक पैसे परत करण्यास नकार देत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. तसेच मे महिन्यातील अनेक टूर रद्द झाल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावीर टूर ॲन्ड ट्रॅव्हल्स या कंपनीचेही काश्मीर, हिमाचल येथे अनेक पर्यटकांचे आरक्षण होते. या हल्ल्यानंतर आता पर्यटकांनी काश्मीर नको असे स्पष्ट कळविले आहे. त्यामुळे आता पर्यटकांचे पैसे परत देणे भाग आहे असे सांगण्यात आले. इतरही छोट्या मोठ्या टूर एजंटनी काश्मीर, कुल्लू, मनाली तसेच वैष्णव देवी व अन्य ठिकाणचे टून आयोजित केले होते. परंतु पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक तिथे जाण्यास तयार नाही. त्यामुळे सर्वच आरक्षणे रद्द करावी लागली असे माहिती या एजंटकडून देण्यात आली.