बुलढाणा : जळगाव नगरितील भाजपचे कार्यकर्ते तथा कंत्राटदार पंकज देशमुख यांच्या कथित आत्महत्यावरून जळगाव विधानसभा मतदार संघात संशय आणि आरोपाचे वादळ उठले आहे. त्यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्या आरोप नुकतेच केला होता, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानीक नेते प्रसेनजित पाटील यांनी हीच मागणी केली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस व सहकार नेते पाटील यांनी पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्याचा दावा केला. तसेच स्थानिक पोलीस दवाबात असून घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. पंकज देशमुख हे आत्महत्या करणारे कमकुवत नव्हतेच असे सांगून त्यांना वा त्यांच्या पत्नीला न्याय मिळेपर्यंत आपण लढा देणार असेही ते म्हणाले.
जळगाव येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हा आरोप केला, ३ मे रोजी पंकज देशमुख यांचा मृत्यू पोलिसांनी कागदोपत्री आत्महत्या दाखविली आहे. पंकज देशमुख यांची आत्महत्या झाली त्या स्थळाची परिस्थिती पाहता आणि शरीरावरील जखमा, त्याची मोडलेली बोटे आणि त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेली तक्रार या सर्व बाबी पाहता ती आत्महत्या नसून घातपातच आहे. या प्रकरणात सुनीता पंकज देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा पाटील यांनी दिला. पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुनीता देशमुख यांची सात्वनपर भेट घेतल्यानंतर स्थानिक बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले की, पंकज देशमुख फार हलाखीच्या परिस्थितीतून गेलेला आहे.त्याने वाईट दिवस पण अनुभवले आहेत, त्याची कोट्यावधी रुपयाची ठेकेदारी आहे. तो एक धाडसी व्यक्ती होता. तो आत्महत्या करू शकत नाही असे माझ्यासह सर्व त्याच्या मित्र परिवाराचे पण म्हणणे आहे. तो एक धाडसी व्यक्ती होता.. पंकजच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाचा आधार गेला. त्याचे मागे त्याची पत्नी लहान मुलगा व मुलगी आहे.संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे त्यामुळे ह्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी ह्या उच्चस्तरीय यंत्रणे मार्फत करावा व सुनीता देशमुख ला न्याय द्यावा असेही ह्यावेळी ते म्हणाले.
ठाणेदार श्रीकांत निचड हे आपल्याला योग्य ती माहिती देत नाहीत असे सुनीता देशमुख यांचे म्हणणे आहे. मृतकाची पत्नी वारंवार मागणी करत आहे की घातपाताच्या दिशेने तपास करावा तरीही ठाणेदार त्या दिशेने तपास करीत नाही. स्थानिक पोलीस यंत्रणेवर मृतकाच्या पत्नीचा विश्वास नाही. पंकज देशमुख कधीही गळ्यामध्ये दुपट्ट किंवा रुमाल घालत नव्हता असे अनेकांचे म्हणणे आहे? मग आत्महत्येच्या दिवशी त्याच्या गळ्यामध्ये दुपट्टे अथवा रुमाल कसा? असे बरेच प्रश्न सुद्धा अनुत्तरीत आहेत. हा तपास वरिष्ठ पातळीवर सीआयडी कडे सोपवावा यासाठी आपण उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना भेटणार असून सुनिता देशमुख हिला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी सांगितले.आज पंकज देशमुख आहे उद्याच्या काळात पंकज देशमुख सारखी अवस्था कुण्या कार्यकर्त्यावर येऊ नये त्यासाठी त्याला न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे पण ते म्हणाले.