लोकसत्ता टीम
वाशीम: अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. १३ मे रोजी वाशीमचे तापमान ४१ अंश सेल्सिअस वर पोहचले आहे. पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानात वाढ होत असून आज १३ मे रोजी वाशीमचे तापमान ४१ अंश सेल्सिअस वर पोहचले आहे. अजून काही दिवस तापमान वाढीची शक्यता असून विविध आजार देखील बळावत चालले आहेत. विशेष म्हणजे लहान मुले आजारी पडत आहेत.
आणखी वाचा-ऊर्जामंत्र्यांच्या शहरात विजेचा लपंडाव! उकाड्यात सर्वसामान्यांना मन:स्ताप
घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर रुमाल, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा,दुपारी १२ ते ४ या वेळात घराबाहेर पडू नये, थेट येणाऱ्या सूर्य प्रकाशात जास्त वेळ थांबू नये, पुरेसे पाणी, ताक,लिंबू पाणी, नारळ या पदार्थाचे सेवन करावे,उन्हात शारीरिक व कष्टाची कामे करू नये, मद्य,चहा, कॉफी चे सेवन टाळावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.