नागपूर: राज्यातील विविध भागातील शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जुन पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना एसटी बसची मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटी महमंडळाच्या च्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पास साठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

या संदर्भात १६ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.

या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातुन केले. त्यामुळे या उपक्रमाला राज्यातील विविध शाळा- महाविद्यालयांकडून कसा प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी महामंडळाकडून सुरक्षित प्रवास वाहतुकीचा दावा

एसटी बसने राज्याच्या विविध भागात रोज लक्षावधी प्रवासी प्रवास करत असतात. एसटीची वाहतूक सुरक्षित असल्याने प्रवासी जास्त असल्याचा एसटीचा दावा आहे. दरम्यान एसटीच्या चालकांना नियमित प्रशिक्षण देण्यासह बसची नियमित देखभाल- दुरुस्ती केली जाते. त्यामुळे एसटीचा प्रवास सर्वात सुरक्षित असल्याचा एसटी महामंडळाचा दावा आहे.