scorecardresearch

पवार म्हणतात, “सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही”; विरोधी पक्षाला वाद टाळण्याचा सल्ला

सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी व्यक्त केले.

sharad Pawar on Savarkar
पवार म्हणतात, "सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही"; विरोधी पक्षाला वाद टाळण्याचा सल्ला (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : “सावरकर आता आपल्यात नाहीत. त्यांच्याबाबत काही वादग्रस्त गोष्टी असल्या तरी काही चांगल्याही बाजू आहेत. त्यामुळे हा विषय टाळायला हवा. आमची लढाई भाजपाविरोधात आहे. सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी व्यक्त केले.

प्रेस क्लबमध्ये शनिवारी आयोजत ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, विरोधी पक्षांच्या एका बैठकीत मी सावरकरांचे काही सकारात्मक मुद्देही लक्षात आणून दिले. त्यांचे काही वादग्रस्त मुद्दे आहेत. परंतु त्यामुळे त्यांच्या चांगल्या बाजूकडे दुर्लक्ष करता येत नाही. राहुल गांधी आपले मत मांडू शकतात. त्यांना स्वातंत्र आहे. इतरांनाही ते आहे. राज्यात लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होणार, असे मला वाटत नाही.

हेही वाचा – वर्धा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार

ईव्हीएमविरोधाबाबत सगळे विरोधी पक्ष एकत्र आहोत. मध्यंतरी देशातील तपास यंत्रणेचा विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांविरोधात दुरूपयोग होत असल्याचे पत्र राष्ट्रपतींना दिले. त्यात काही उदाहरणेही दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. विदेशात जाऊन स्वत:च्या देशाबद्दल बोलण्याच्या विषयात मला फारसे काही महत्तवाचे वाटत नसल्याचेही पवार म्हणाले. अलीकडे संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे काही अनुचित प्रकार घडले. त्यावर काही राजकीय व्यक्तींनी मतही व्यक्त केले. पण, यावर जास्त चर्चा योग्य नाही. आता परिस्थिती निवळली आहे. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी धार्मिक स्थिती बिघडू नये म्हणून काळजी घेण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

हेही वाचा – वीज दरवाढीचा शॉक! ग्राहकांवर वीज वापरासाठी किती पडणार भुर्दंड जाणून घ्या..

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या संयुक्त समितीने २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचा निर्णय घेतला. त्याला पोलिसांची परवानगी असल्यास तेथे सभा घ्यावी. परवानगी नसल्यास सभा टाळावी, असेही पवार म्हणाले. जगातील काही देश कापूस आयात करतात. त्यांनी भारतातून येणाऱ्या कापसावर कर वाढवला. दुसरीकडे भारताने मात्र विदेशातून आपल्याकडे येणाऱ्या कापसावर कर वाढवून बंधन घातले नाही. त्यामुळे कापसाच्या दराची समस्या उद्भवली, असेही पवार म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 12:23 IST

संबंधित बातम्या