नागपूर : हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज खरा ठरला असून मोसमी पावसाचा प्रवास किमान १० जूनपर्यंत तरी रखडला आहे. केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. वातावरणात बदल झाला असून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी झाली आणि आता मोसमी पावसाचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान दहा जूनपर्यंत तरी मोसमी पाऊस पुढे सरकण्याची कोणतीही शक्यता नाही. केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलांमुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात तापमानाचा पारा पुन्हा ४० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा व खानदेशात देखील कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस पर्यंत राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
पावसाची शक्यता कुठे..
पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये आजपासून चार जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज मुंबईसह ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पालघरमध्ये हलक्या पावसाच्या सरीची शक्यता आहे. चार जून दरम्यान या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस कायम राहील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील.
मोसमी पावसाबाबत वाद काय..
राज्यात यंदा मान्सू १२ दिवस आधीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने ही घोषणा केली. सर्वसाधारण मान्सून महाराष्ट्रात सात जूनला प्रवेश करतो, मात्र यंदा २५ मे रोजीच त्याचे आगमन हवामान खात्याने घोषित केले. या मोसमी पावसाने महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. मात्र, आता राज्यात पावसाची गती मंदावली असून, पुढील १० जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, हा पाऊस गडगडाटी असल्याने आणि मोसमी पावसाच्या निकषात बसणारा नसल्याने हवामान शास्त्रज्ञांनी तो पूर्वमोसमी पाऊस असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी पावसाचा प्रवास थांबणार असल्याचे देखील आधीच सांगितले होते.