नितीन पखाले

यवतमाळ : ऐन गणेशोत्सवात गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात बंजारा, आदिवासी व दलित समाजातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पोळा, गणेशोत्सव, गौरीपूजन आदी सण आले की, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांनी समाजमन ढवळून निघते, त्याची दुर्दैवी पुनरावृत्ती यावर्षीही होताना दिसत आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अर्जुना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या नऊ महिन्यांत विदर्भात १ हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. गेल्या २५ वर्षांतील ही विक्रमी संख्या असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच्या कापूस, सोयाबीनच्या मंदीमुळे तसेच प्रचंड नापिकीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. लागवडीचा खर्च वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याचा आरोप आहे. कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शाश्वत पीक, डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जागतिक हवामानातील बदल हेसुद्धा सध्याच्या कृषी संकटाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>पैनगंगा नदीत तरुण बुडाला; २२ तासानंतर मृतदेह सापडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संसदेच्या विशेष सत्रात चर्चेची मागणी

शेतकरी आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा)चे राष्ट्रीय प्रवक्ते व महाराष्ट्राच्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. विदर्भात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना भविष्यात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल आहे. संसदेच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भाचा दौरा करावा, तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करून विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे.