नागपूर : कामठीतील युवा व्यवसायिक आयुष त्रिवेदी याच्या आत्महत्येचे रहस्य मोबाईलमधून उलगडणार आहे. कर्जबाजारीपणा, सट्टेबाजीत हार की वाळू माफियांची भीती अशा कारणांतून आयुषने आत्महत्या केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासातून आयुषच्या आत्महत्यामागील सत्य समोर येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष त्रिवेदीने वयाच्या २६ व्या वर्षी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली होती. त्याने ६ ट्रक आणि पोकलँड मशिनही खरेदी केली होती. त्याचा वाळू विक्रीचाही व्यवसाय होता. व्यवसायाच्या स्पर्धेतून आयुषचे काही वाळू माफियांसोबत वादही झाला होता. आयुष अविवाहित होता. त्याने तुमसर येथून खनिकर्म शाखेत पदविका पूर्ण केली. सर्वकाही सुरळीत सुरू असताना मंगळवारी सकाळी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी नातेवाईक आणि मित्रांचे जबाब नोंदविले आहे.

हेही वाचा – अमरावती : सावधान! ‘ऑनलाइन पार्ट टाईम ऑफर’च्या नावावर फसवणूक

महिन्याला जवळपास १० ते १२ लाख रुपये त्याची कमाई होती. अशा भक्कम आर्थिक स्थितीत आत्महत्येचे कारण कर्ज असेल हे पोलिसांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे आता पोलीस सर्व दिशांनी प्रकरणाचा तपास करीत आहेत. आयुषच्या डोक्याच्या मागच्या बाजूने गोळी घुसल्यावरही संशय निर्माण झाला आहे. समजा एखादा व्यक्ती स्वतला गोळी मारतो तेव्हा डोक्यावर किंवा डोक्याच्या मागाच्या भागात नव्हे तर कानशिलात नेम धरतो. डोक्याच्या मागे पिस्तूल लावून गोळी झाडणे अशा घटना क्वचितच घडतात.

घटनेच्या वेळी आयुष त्याच्या खोलित एकटाच होता. त्याच्या खोलिचे दारही उघडे होते. मृतदेह बेडवर पडून होता. त्याच्या हातात पिस्तूल होती. डोक्याच्या मागून गोळी घुसली, मात्र बाहेर आली नाही. विशेष म्हणजे गोळी चालल्याचा आवाजही कोणाला ऐकू आला नाही. पोलीस अधिकारी डॉक्टर आणि फॉरेंसिक तपास तज्ज्ञाच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.

हेही वाचा – नागपूर : दहा वर्षांत वंध्यत्वाचे प्रमाण १० टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर! स्त्रीरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाळूच्या व्यवसायात वाद

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूच्या व्यवसायात आयुषचा खापरखेड्यात वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी त्याला मारहाणही करण्यात आली होती. त्याच्या जवळ असलेली पिस्तूल जवळच्या एका चर्चित गुंडाने विकली असल्याची चर्चा आहे. आयुषने एका बुकीकडे सट्टा लावला होता. मात्र अचानक सौदा उलटल्याने त्याला काही लाख रुपयांचे नुकसान झाल्याचीही चर्चा आहे.