नागपूर : राज्याच्या बहूतांश जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागल्याचे संकेत या घसरणाऱ्या तापमानाच्या पाऱ्याने दिले आहेत. तर येत्या काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

थंडीने यंदा चांगलीच प्रतिक्षा करायला लावली. मोसमी पावसाचे आगमन आणि परतीचा प्रवास वेळेत झाला असला तरीही अवकाळी पावसाने थंडीचे गणित बिघडवले. परिणामी पावसाळ्यानंतरही नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहात होते, पण ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. राज्यातील नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील तापमानात सर्वाधिक घसरण झाली आहे.

हे ही वाचा… गडचिरोलीत महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार? शेतकरी कामगार पक्षाचा दावा…

तर जळगाव, सांगली, नागपूर या जिल्ह्यात देखील तापमानात बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. तापमानाचा पारा घसल्याने हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुडील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. तर पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरनंतर संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात रात्री व पहाटेच्या हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली असली तरीही हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची मात्र प्रतिक्षाच आहे.

राज्यात पुण्यातील किमान तापमानात वेगाने घसरण होत आहे. त्यामुळे पुणेकर थंडी अनुभवत आहेत. या तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात देखील चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. येथेही किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. कोकण विभाग आणि विदर्भातील हवामान मात्र पुढील काही दिवस कोरडेच असणार आहे. दरम्यान विदर्भाची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कालपासून ढगाळ वातावरण आहे. येथेही कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या जवळ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. राज्यातील नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनध्ये देखील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे.

हे ही वाचा… दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे याठिकाणी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी हुडहुडी भरवणारी थंडी नागरिकांना लवकरच अनुभवायला मिळेल. तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १५ नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होणार असल्याने हुडहुडी भरवणारी थंडीसाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान या बदललेल्या वातावरणामुळे सर्दीसारख्या आजारात वाढ झालेली आहे.