चंद्रपूर : ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील मुख्य मार्गावर पर्यटक लोकांचा गोंगाट, गाडीतून उतरून वाघांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पर्यटकांमध्ये स्पर्धा सुरू असल्याने एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मुख्य मार्ग असलेल्या पद्मापूर ते मोहरली या मार्गावर मागील काही दिवसात पर्यटकांचा प्रचंड गोंगाट पाहायला मिळत आहे. एप्रिल व मे महिन्यांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाघांचं दर्शन होत आहे. ताडोबा कोर ते ताडोबा बफर असा हा प्रमुख मार्ग आहे आणि या मार्गावर वाघांचं सातत्याने दर्शन होत असल्यामुळे या मार्गावर पर्यटकांसह सामान्य लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तरुण व तरुणी मोटार सायकलने ताडोबा मार्गावर येत आहेत. टायगर सफारी न करता देखील वाघ पाहायला मिळत असल्यामुळे लोकं रोज मोठ्या प्रमाणात या मार्गावर गर्दी करतात. धक्कादायक म्हणजे वाघ दिसताच पर्यटक तथा लोकं या ठिकाणी वाहनांची गर्दी करतात, गोंगाट करतात आणि काही लोकं तर अगदी वाहनाच्या खाली उतरून देखील फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी वाघांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.
हा सर्व प्रकार वाघांसाठी जितका त्रासदायक आहे तितकाच हा लोकांच्या देखील जीवावर बेतू शकतो. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून लोकांचा हा गोंधळ आता नित्याचीच बाब झाली आहे. अशा लोकांवर वन विभागाने गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाई करून जवळपास २८ लाख रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे मात्र दंड वसूल करूनच हा प्रश्न निकाली लागणार नाही हे मात्र नक्की. दरम्यान, नियमभंग करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जात असून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले.