नागपूर : मोसमी पावसाने राज्य व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली. मात्र, विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशाकडे मोसमी पावसाचे वारे आले, पण पावसाने पाठ फिरवली. जून महिन्यातील पहिल्या २० दिवसांच्या कालावधीत राज्याच्या या तीनही भागात पावसाची मोठी तूट दिसून आली. विदर्भात ५७ टक्के पावसाची तूट आहे, जी देशात सर्वाधिक आहे. तर मराठवाड्यात ३९ टक्के पावसाची तूट आहे. त्याचा परिणाम या भागातील पेरण्यांवर झाला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे.

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात गेल्या दहा दिवसात मूसळधार पाऊस पडला आहे. एवढेच नाही तर राजस्थानचा पूर्व भाग जिथे विदर्भापेक्षा केवळ एक तृतीयांश पाऊस पडतो, तिथे यंदा विदर्भाच्या जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे. पूर्व राजस्थानात सर्वसाधारण ३०.९ मिलीमीटर पाऊस पडतो आणि यावेळी तिथे ७३.३ मिलीमीटर पाऊस पडला. तर विदर्भात ९३.३ मिलीमीटर पाऊस पडतो आणि तिथे ३९.७ मिलीमीटर पाऊस पडला. विदर्भात बंगालच्या उपसागरावरुन येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भरपूर पाऊस पडतो, पण यावर्षी अजूनही तशी स्थिती निर्माण झालेली नाही.

मे मध्ये झालेल्या वादळी पावसानंतर आणि मुंबईत झालेल्या पावसानंतर समाजमाध्यमांवर काही स्वघोषित हवामान तज्ज्ञांनी मोसमी पावसाचे अंदाज देण्यास सुरुवात केली. त्याला शेतकरी बळी पडले आणि त्यांनी पेरणीला सुरुवात केली. मराठवाड्यात सुमारे ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. तर विदर्भात २० ते ३० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र, पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे.

यावर्षी स्थिती जास्त धोकादायक

राज्यात आम्ही सगळीकडेच फिरत असताना विदर्भ व मराठवाड्यातील पेरणीची परिस्थिती यावर्षी जरा जास्त धोकादायक वाटत आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बिड, परभणी, जालना या जिल्ह्यात पेरणीला धोका आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उद्भवणार अशी चिन्हे आहेत. विदर्भात देखील काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. याठिकाणी कापूस वाचेल, पण बाकी पेरण्या वाया जाण्याचीच शक्यता अधिक आहे. तर कापसाला मात्र फार धोका नाही. समाजमाध्यमांवर स्वघोषित हवामानतज्ज्ञांच्या अंदाजामुळे देखील शेतकरी तोंडघशी पडत आहेत.

गजानन जाधव, कृषी अभ्यासक

वादळी पाऊस थांबला

भारताच्या पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे राज्यात सलग दिवस मोसमी पावसाचा प्रवास रखडला होता. दहा जूनच्या आसपास मोसमी पावसाचे वारे सक्रीय व्हायला लागले. १६ जूनपासून राज्यात मोसमी पावसाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. एका दिवसात मोसमी पावसाच्या वाऱ्यांनी राज्य व्यापले. मात्र, त्याचवेळी वादळी पाऊस जवळपास थांबला. पावसाच्या हलक्या सरींचा प्रवास सुरू राहीला. त्यातही विदर्भ आणि खानदेशात पावसाने दडी मारल्यामुळे तापमानात वाढ झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. अक्षय देवरस, संशोधन शास्त्रज्ञ, ब्रिटन