Mumbai Maharashtra Weather Updates : मोसमी पावसाचे वारे मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी खात्याने ‘रेड अलर्ट’ देखील दिला आहे. मात्र, विदर्भात तसेच मराठवाड्यात या आठवड्यात पावसाचा जोर तितका अपेक्षीत नाही. तर पूर्व विदर्भात पाऊस एकंदरीत चांगला झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्यांच्या भागात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नाही, त्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, असा सल्ला युकेतील नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स येथील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी दिला आहे.

मोसमी पाऊस उद्या राज्य व्यापणार म्हणजेच मोसमी पावसाचे वारे येतील. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर वगळता पावसाचा जोर फारसा राहणार नाही. ज्याठिकाणी आधीच जोरदार वादळी पाऊस पडला आहे आणि तापमान कमी आहे, अशा ठिकाणी हा विखुरलेल्या स्वरुपाचा पडणारा पाऊस फायद्याचा राहील. शिवाय विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये समाधानकारक वादळी पाऊस देखील झालेला नाही. सध्या मोसमी पावसाचे वारे येत आहेत. त्यातून आर्द्रता आणि ढगांचे प्रमाण वाढेल. सामान्यपणे विदर्भात बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचे पट्टे येत असतात. ज्यामुळे जोरदार पाऊस पडतो. मात्र, या आठवड्यात तरी अशी स्थिती अपेक्षीत नाही. राज्यातील इतर भागांपेक्षा विदर्भात पावसाची तूट अधिक आहे. १५ दिवस उन्ह तापलेले हाेते. तापमान जवळजवळ ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. शिवाय वादळी पाऊस देखील झालेला नाही. त्यामुळे जमीन अजूनही कोरडी आहे आणि अशा स्थितीत पेरणी होऊ शकत नाही.

आतापर्यंतचा पाऊस

एक जून ते १६ जूनदरमयन कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या २२ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एक टक्का कमी, मराठवाड्यात सरासरीच्या २६ टक्के कमी आणि विदर्भात सरासरीच्या ६१ टक्के कमी पाऊस पडला आहे. यादरम्यान राज्यातील १३४ तालुक्यांमध्ये एकूणच पाऊस ६५ मिलीमीटरहून अधिक पडला आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्ये एकूण पाऊस ६५ मिलीमीटरपेक्षा कमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोसमी पावसापूर्वीच्या वादळी पावसाचा जोर हा विदर्भात आणि प्रामुख्याने पूर्व विदर्भात कमी होता. त्याठिकाणी राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कमाल तापमान देखील अधिक होते. अशा भागात पेरणीसाठी जोरदार पावसाची गरज आहे. २२ तारखेपर्यंत या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई कर नये. ” – डॉ. अक्षय देवरस, संशोधन शास्त्रज्ञ, नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स, युके