नागपूर: नागपूरला दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. त्यासाठी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्थेची सोय आहे. यावेळी दोन उपमुख्यमंत्री आहेत. एका उपमुख्यमंत्र्यासाठी ‘ देवगिरी’ हा बंगला पूर्वीपासूनच आहे. मात्र दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांसाठी प्रशासनाला नवा बंगला शोधावा लागला.

‘देवगिरी’ बंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राखीव आहे. सर्व सोयींनी सज्ज असलेला हा बंगला असून त्याचा परिसरही विस्तीर्ण आहे. अशाच प्रकारचा दुसरा बंगला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी तयार करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागापुढे होते. ते त्यांनी स्वीकारून सिव्हील लाईन्समध्येच एका वरिष्ठ पोलीस अधकाऱ्यांच्या बंगल्याची निवड अजित पवार यांच्या निवासस्थानासाठी केली. कोट्यवधी रुपये खर्च करून या बंगल्याचा कायापालट करण्यात आला. त्याला ‘विजयगड’ असे नाव देण्यात आले. हा बंगला देवगिरी’ च्या तुलनेत कुठेही कमी नाही. अजित पवार यांच्याकडे अधिवेशन काळात येणाऱ्या कार्यकर्ते, नेत्यांची गर्दी लक्षात घेऊन येथे त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालयही आहे. दोन्ही ठिकाणी अधिवेशनापूर्वी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा… खोदकामापूर्वी सरकारी यंत्रणांना या प्रणालीवर करावी लागणार नोंदणी

नागपूर अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘रामगिरी’ महत्वाचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जाते. त्यानंतर क्रम लागतो तो देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ देवगिरी’ या निवासस्थानाचा. हे दुसरे सत्ताकेंद्र मानले जाते. यंदा ‘ विजयगड’ हे अजित पवार यांचे निवासस्थान तिसरे सत्ताकेंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

सिव्हील लाईन्स परिसरातील रविभवनमध्ये कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्ष नेते, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापतींची निवासस्थाने आहे. तेथे भेट देणाऱ्यांचीही संख्या अधिक असते. मात्र ‘रामगिरी’ आणि ‘ देवगिरी ’ चे महत्व वेगळे आहे. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आमदारांची गर्दी अजित पवार यांच्या ‘विजयगड’ वर होणार आहे. राज्यमंत्र्यांसाठी नागभवन सज्ज आहे. तसेच अधिवेशनासाठी मुंबईतून नागपूरला येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीही येथे स्वतंत्र निवासव्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशन काळात विधानभवनात मंत्री कार्यव्यस्ततेमुळे कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, ते सर्व मंत्र्यांच्या बंगल्यावर येतात. त्यामुळे पोलिस सुरक्षेवरही ताण वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील सिव्हील लाईन परिसर तेथील शांततेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र अधिवेशन काळात लोकांच्या गर्दीमुळे व्हीव्हीआयपींच्या वाहनांमुळे येथील शांतता भंग होते. प्रवेशपत्राशिवाय रविभवन परिसरात प्रवेश दिला जात नाही. मात्र मागील काही वर्षांपासून मोठ्या संख्येने प्रवेशपत्र वाटप केले जात असल्याने गर्दीवर नियंत्रण कसे ठेवावे असा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडतो.