भंडारा : तुमसर तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरलेली आणि भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी सध्या गंभीर संकटातून जात आहे.तुमसर तालुक्यात अनेक ठिकाणी नदीच्या काठांचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असल्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन नदीपात्रात समाविष्ट होत आहे.
बेसुमार वाळू उत्खननामुळे नदीपात्रात दगड व माती दिसत आहे. अनेक ठिकाणी यामुळे नदीचे पात्र उथळ बनले. काही ठिकाणी जलप्रवाहात अडथळे निर्माण झाले. परिणामी, नदीकाठच्या परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून, जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तुमसर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका वाढला आहे. शेकडो हेक्टर शेतातील पिके नष्ट होतात. शेती नदीपात्रात समाविष्ट होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे कायम दुर्लक्ष होते.
वैनगंगा ही केवळ एक नदी नाही, तर संपूर्ण विदर्भातील लाखो जनतेच्या जीवनाची आधारवड आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन दुहेरी मापदंड थांबवावेत, अन्यथा भविष्यात या नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहील, अशी लोकांची भावना आहे.शेती, घरांच्या नुकसानीची शक्यता.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते.
नदीकाठावरील बपेरा, मांडवी, रेंगेपार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाह्मणी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, रोहा यांसारख्या, ढोरवाडा, सुकडी (दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सुपीक व गाळाची शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तालुक्यातील अनेक गावांजवळ वैनगंगा नदीच्या काठांवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर काठांची धूप मोठ्या प्रमाणात होते. ज्यामुळे भूस्खलनाची समस्या अधिक गंभीर बनते. काठावरील झाडे, माती आणि दगड नदीपात्रात कोसळल्याने नदीची खोली कमी झाली. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीचे आणि घरांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे.
शासनाचे दुर्लक्ष आणि जनतेचा संताप
पर्यावरणप्रेमी व स्थानिक ग्रामस्थांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत की, गंगेच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने ‘नमामि गंगे’ अंतर्गत हजारो कोटी रुपये खर्च केले, मात्र वैनगंगा नदीसारख्या महत्त्वाच्या आणि लाखो जनतेच्या जीवनाशी निगडित नदीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.