लोकसत्ता टीम

भंडारा : मृग नक्षत्र कोरडा गेला, जुलै महिन्याला सुरवात झाली असून अजूनही जिल्ह्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी धान पिकांसह इतर पिकांची पेरणी केली आहे. पेरणी केलेली पिकेही उगवली आहेत. मात्र पावसाअभावी उगवलेले पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत पावसाअभावी सुकलेली धानाची नर्सरी वाचविण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील एका शेतकऱ्यावर चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यासह लाखांदूर तालुक्यात अद्यापही चांगला पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांनी धान्याच्या नर्सरी लावल्या मात्र बियाणांची उगवणी होताच पावसाचा खंड पडल्याने अनेक ठिकाणी धान नर्सरी उष्णतेमुळे करपू लागल्या आहेत. धानाच्या नर्सरी वाचविण्यासाठी आता शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. लाखांदूर तालुक्यात प्रथमच टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा-माकडांमुळे भीमकुंड धबधबा परिसरात दोन दिवस पर्यटकांना प्रवेशबंदी; वनविभागाने अखेर ‘त्या’ माकडांची…

लाखांदूर तालुक्यातील विविध भागात खरिपाच्या काळात चौरस परिसरातील गोसे खुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातून इटिया डोह धरण व कृषी विद्युत पंपासह सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तर पावसाच्या पाण्याने किमान क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र, गेल्या काही दिवसांत सिंचनाची सोय असलेल्या क्षेत्रासह तालुक्याच्या बिगर सिंचनाखालील एकूण १८३३ हेक्टर क्षेत्रात भात रोपवाटिकेची पेरणी झाल्याची माहिती आहे. मात्र, पावसा अभावी नर्सरी उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

बहुतांश शेतकऱ्यांकडून विविध सुविधांद्वारे सिंचन केले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिगर बागायती भागातील धान नर्सरी पावसाअभावी सुकू लागल्या आहेत. ही धान नर्सरी वाचवण्यासाठी लाखांदूर येथील एका शेतकऱ्याने टँकरने पाणीपुरवठा केला आहे.

आणखी वाचा-भेंडी, शेंगा, वांगे खाऊन कंटाळा आलाय? मग चला रानभाजी खायला; ‘ही’ गावे पंचक्रोशीत आहेत प्रसिद्ध…

नेहमीप्रमाणे पावसाळा लागताच शेतकरी शेतीच्या कामाला लागतो. जिल्ह्यातही शेतकऱ्यानी पेरणी केली. जून महिन्यात जिल्ह्यात पावसाने अधेमध्ये हजेरी लावली. या पावसात शेतकरी धानाचे पऱ्हे टाकले. मात्र आता जुलै महीना लागला असुन पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे जमिनीतून निघत असलेले पिकांचे कोंब आता कोमेजू लागले आहेत. त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. येत्या दोन दिवसात दमदार पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल.

१,०१८ हेक्टर पिकांवर पाण्याचे संकट

यंदा खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात एकूण १.०१८ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली आहे. या पेरणीअंतर्गत एकूण ३३४ हेक्टर बिगर सिंचन क्षेत्रात भाताची पेरणी झाली आहे. तर उर्वरित क्षेत्रात तूर पिकासह तीळ, सोयाबीन व भाजीपाला पिकांची ५६८ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पुरेशा पावसाअभावी बिगर बागायती भागात पेरणी केलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास बहुतांश पिके उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्तदिन विशेष : ‘प्लास्टिक पिशवीची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा’; डॉक्टर दाम्पत्याची विशेष मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुबार पेरणीचे संकट

मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. नियमित पाऊस येईल व धान शेती लागवड होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र सध्यातरी जिल्ह्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन आहे. भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची वेळ आली आहे. पावसाच्या लहरी पणाचा फटका आता शेतकऱ्यांनी बसणार आहे. यामुळे आता तरी दमदार पाऊस व्हावा यासाठी शेतकऱ्यांकडून देवाला साकडे घातले जात आहे.