बुलढाणा: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयावर विशाल ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आज शुक्रवारी, २ मे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रणरणत्या उन्हात काढण्यात आलेला हा मोर्चा ठाकरेंच्या शिवसेनेचे जंगी शक्ती प्रदर्शन ठरले. यानिमित्त विधानसभेतील समिश्र यशा नंतर जिल्हा शिवसेनेच्या एकजुटीचे दिमाखदार दर्शनही या मोर्च्यात घडले.
बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती भागातील राष्ट्रमाता जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल येथून आज दुपारी अडीच वाजता या मोर्च्याला सुरुवात झाली. या मोर्च्यात सहभागी कमिअधिक दोनशे ट्रॅक्टर बुलढाणा बाजार समिती परिसरात उभे ठेवण्यात आले होते. तिथून हे शेकडो ट्रॅक्टर शिवसेनेचे झेंडे लावून शिस्तीने मोर्च्यात सहभागी झाले. मात्र यामुळे संगम चौक सह काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांच्या नियोजन अभावी वाहतुकीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुखद्वय जालिंदर बुधवत, वसंत भोजने, सह संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हा समन्वयक संदिपदादा शेळके, युवा सेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा प्रमुख मोहम्मद सोफियान यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
मागण्या
शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, सोयाबीन, कापूस, मका यासह इतर शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना बिना अटी शर्तीसह सरसकट पिक विमा द्यावा, तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचे रखडलेले अनुदान देण्यात यावे.
वन्य प्राण्यापासून शेतीमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतीला तार कंपाउंड बसवून देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण वीज बिल माफ करून, शेतीसाठी मोफत विज देण्यात यावी आदि मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्च्यात डी एस लहाने , गोपाल बछिरे, सुमित सरदार, संजीवनी वाघ, आशिष रहाटे, सुनील घाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे, अशोक गव्हाणे, सुधाकर आघाव, अरुण पोफळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, निंबाजी पांडव, किसन धोंडगे, श्रीराम खेलदार, दिपक चांभारे, ईश्वर पांडव, सिद्धेश्वर आंधळे, गणेश सोनुने यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले .
‘युतीने बळीराजाची फसवणूक केली’
यावेळी बोलतांना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी युती सरकारवर टिकास्त्र सोडले. आमचे नेते उद्धव बाळासाहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा घेतला. शेतकऱ्यांना कुठल्याही कागदपत्रांची अट न घालता दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली होती. त्याउलट फडणवीस शिंदे आणि अजित दादा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.निवडणूक झाल्यानंतर तीन महिन्यातच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी याला नकार दिला. ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची फसवणूक आहे.