नाशिक – जवळपास दहा दिवसांपासून सुरू असलेल्या वळिवाच्या पावसामुळे नाशिक विभागात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सात जणांचा वीज अंगावर पडून तर, इतरांचा झाड कोसळणे, विजेचा धक्का लागणे आणि घरावरील पत्रे पडल्याने मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. नाशिकमध्ये मे महिन्यात १०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या काळात वीज पडून इगतपुरी तालुक्यातील पूजा भांगरे (२३), सिन्नर तालुक्यातील विलास बर्डे (१२) यांचा मृत्यू झाला. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात रमेश पवार (३४) आणि तुषार वळवी, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील रवींद्र देवरे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील गणेश काळे यांचाही वीज पडून मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी अमळनेरसह पारोळा, एरंडोल व इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील शरद भिल (३५) या शेतमजुराचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. वादळी वाऱ्यात नाशिक शहरात ४०० झाडे पडल्याची महानगरपालिकेची आकडेवारी आहे. सातपूर येथे झाड उन्मळून पडल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या सम्यक भोसले (१९) आणि गौरव रिपोर्टे (२१) या दोन मित्रांचा मृत्यू झाला.
सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथे रामदास सहाणे (३५) यांचा वीज तारेचा धक्का लागल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात झाड पडून शिवाजी वाघचौरे (६४) यांचा तर कर्जत येथे घराचे पत्रे पडून जखमी झालेल्या आरती लहारे (४१) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील पारदेवी येथील लालचंद सदगीर (५०) हे वीज पडून जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीत मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासकीय मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.