नाशिक – कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा प्रश्न राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी उपस्थित केला. घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

वळवाच्या पावसामुळे राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या दोन प्रकारच्या कांद्याचाही समावेश आहे. शासकीय यंत्रणा उभ्या पिकाचे पंचनामे करीत असल्याच्या तक्रारींवर कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी भाष्य केले. रविवारी मुसळधार पावसात सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही भाग कोसळला होता. त्याची पाहणी कोकाटे यांनी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये निम्मे प्रमाण कांद्याचे आहे. त्यामध्ये शेतातून काढून खळ्यात आणि चाळीत ठेवलेल्या तसेच शेतात काढणीवर आलेल्या कांद्याचाही समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार शेतातील उभ्या पिकांना नुकसानीपोटी भरपाई मिळते. कापणी झालेल्या पिकाला भरपाई दिली जात नाही. त्यामुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे.