नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत गुंतलेल्या नाशिक नगरीत हत्या, प्राणघातक हल्ले, टोळक्याचा धुडगूस, लूटमार, वाहनांची तोडफोड, सोनसाखळी खेचून नेणे आदी गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढत आहे. शहरात पहिल्या पाच महिन्यात २५ हत्या झाल्या आहेत. पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक राहिला नसल्याचाच हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मागील वर्षभरात शहरात जितक्या हत्या झाल्या, यंदा तुलनेत पहिल्या पाच महिन्यातच निम्म्याहून अधिक म्हणजे २५ हत्या झाल्या आहेत. महिन्याला सरासरी पाच हत्या होत असून प्राणघातक हल्ले, लूटमार, वाहन तोडफोड आदींची मोजदाद नसल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी राजकीय वरदहस्तामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली होती. अनेक भागात टोळ्या निर्माण झाल्या होत्या. वर्चस्ववादातून त्यास टोळी युद्धाचे स्वरुप प्राप्त झाले होते. पुन्हा एकदा शहराची त्याच दिशेने वाटचाल सुरू झाल्याची साशंकता सामान्यांकडून व्यक्त केली जाते.

लूटमार, मद्यपींचा धुडगूस, कोयता घेऊन फिरणे, मारहाण हे प्रकार राजरोस घडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणाच्या संशयावरून सातपूर भागात युवकाची हत्या झाली होती. पाठोपाठ बुधवारच्या आठवडे बाजारात वडिलांच्या खिशातून पैसे हिसकावणाऱ्या टोळक्याला विरोध केल्याने १९ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली.

किरकोळ कारणावरून हत्या, प्राणघातक हल्ल्यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. यात अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक आहे. पोलिसांचा कुठेही वचक राहिलेला नाही. पादचारी महिलांचे दागिने दुचाकीवरून आलेले चोरटे खेचून सहज पसार होतात. पोलीस रस्त्यावर आहेत, असे सहसा दिसत नाही. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रमुख मार्गांवर होणारी नाकाबंदी, वाहन तपासणी कधीतरीच होते. काही प्रकरणांत पोलीस तत्परतेने गुन्हेगारांना जेरबंद करतात. मात्र गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे.

नाशिक शहरात २०२३ मध्ये ४२ आणि २०२४ मध्ये ४० हत्या झाल्या होत्या. यावर्षी पहिल्या पाच महिन्यातच हा आकडा २५ वर पोहचला आहे. २०२३ या वर्षात पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध प्रकारचे एकूण ४५२७ गुन्हे तर २०२४ मध्ये ही संख्या ४५८० इतकी होती. चालु वर्षात जानेवारी ते मे या कालावधीत २१३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

सहा महिन्यातील आकडेवारी काय सांगते ?

हत्या – २५

हत्येचा प्रयत्न – ३८

हेतूपूर्वक घातक कृत्य – सहा

बलात्कार – ३८

दरोडा – सहा

लूटमार -एक

सोनसाखळी लूटमार – ६१

दंगल – ३४

वाहनचोरी – ३२३

नुकसान करणे – १४३

दुखापत – २५६

शहर वाढीने गुन्हेगारीतही वाढ

शहराचा वेगाने विस्तार होत आहे. शहर चारही बाजूने वाढत असतांना गुन्हेगारीही वाढत आहे. सराईत गुन्हेगारांप्रमाणे सामान्य माणसांच्या हातातही शस्त्रे आली आहेत. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम होत आहे. यामध्ये तपासणी मोहीम, तडीपारी, बाल गुन्हेगारांचे समूपदेशन करण्यात येत आहे. गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासाठी सातत्याने गस्तीवर भर देण्यात येत आहे. मुख्य म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा छडा लावताना काही तांत्रिक अडचणी येतात. यामुळे गुन्ह्याची उकल होण्यास विलंब होतो. एखादा गुन्हेगार लगेच सापडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हेगारी विश्वात चढ-उतार चालु राहतात. ते नियंत्रणात येतीलच असे नाही. नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा. पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. – संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक)