जळगाव – महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ दे. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे. चांगला पाऊस होऊ दे आणि चांगले पीक येऊ दे, हे साकडे पांडुरंगाला घातले आहे. आणि तेवढेच माझ्या मनात आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जळगाव दौऱ्यावर हाणला.

काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना, आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी मनसेशी युती करण्याच्या संदर्भात भाष्य केले आहे.  महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असे त्यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमच्या मनात काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी थेट उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता माझ्या मनात महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांच्या भल्याशिवाय दुसरा कोणताच विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. संतांची लाडकी बहीण मुक्ताईच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मी येथे आलो आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगरातून रवाना होणाऱ्या संत मुक्ताईंच्या पालखीत सहभागी वारकऱ्यांना शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सदरची योजना राबविल्याने महायुतीचे सरकार अजिबात अडचणीत आलेले नाही. त्यासाठीची आर्थिक तरतूद सरकारने आधीच केलेली आहे. दर महिन्याला त्याची व्यवस्था नियमितपणे केली जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना आणि महायुतीचे सरकार अडचणीत येणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.