लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात मार्च महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. बुधवारी मध्यरात्री तशीच घटना घडली. डांभूर्णी शिवारातील एका शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात घबराट उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील डांभुर्णी शिवारात प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर शेतात सर्वजण निवांत झोपलेले असताना, बुधवारी मध्यरात्री शेजारील केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून रत्ना नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेला उचलून नेले. गाढ झोपेत असलेली रत्नाची आई जिजाबाई रूपनर ही मुलीचा आवाज ऐकून जागी झाली. तिने मुलीचा जीव वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत बिबट्या बालिकेला घेऊन अंधारात पसार झाला होता. मेंढपाळांनी लागलीच आजुबाजुच्या केळी बागांमध्ये बालिकेचा शोध घेणे सुरु केले. काही अंतरावरच त्यांना शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेतील बालिकेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन वर्षाच्या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रात्रीच वन विभागाचे अधिकारी विपूल पाटील, पश्चिम विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पंचनामा पूर्ण करून बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. दरम्यान, चोपडा-यावल मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी देखील घटनेची माहिती मिळल्यानंतर लगेचच वन विभागाला पुढील कार्यवाही तसेच नरभक्षक बनलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी तोपर्यंत रात्रीचे शेतात पाणी भरण्यासाठीचे काम करताना खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.