जळगाव: शहरासह जिल्ह्यातील तापमान ४५ अंशांवर पोहोचले असताना, शनिवारी रात्री वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वारे आले. वादळी वाऱ्यामुळे रावेरसह मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांत केळीबागा जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे अगोदरच विविध समस्यांनी त्रस्त केळी उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत होती. मात्र, शनिवारी रात्री आठच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यामुळे शहरातील सम्राट कॉलनीसह पिंप्राळा व इतर ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घराघरांत धुळीचे लोट आले. धुळीतून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. वादळी वार्‍यांमुळे झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. शिवाजीनगरसह गेंदालाल मिल परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी थेट वीज उपकेंद्रावर धडक दिली होती. शहरातील वाघूर पंपगृहाचाही वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा वेळापत्रकाच्या नियोजनानुसार जळगावकरांना पाणीपुरवठाही एक दिवस उशिरा होणार आहे.

हेही वाचा : नाशिकमधील ज्वेलर्सकडे सापडलं २६ कोटींचं घबाड; नोटांचा खच, ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता

जिल्ह्यातील केळी उत्पादक अगोदरच विविध समस्यांनी चिंताग्रस्त झालेला असताना शनिवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यांत रात्री जोरदार वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्यात रावेर तालुक्यातील अटवाडा, दोधे, नेहते, अजनाड आदी गावांसह मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, पातोंडीसह विविध गावांच्या शिवारातील केळीबागा आडव्या झाल्या. बोदवड तालुक्यातील शिरसाळा, चिंचखेडासिम, लहान मनूर, ऐनगाव, चिखली यांसह विविध गावशिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्या. वादळात हजारो हेक्टर क्षेत्रातील केळीचे मोठे नुकसान झाले. यंदा केळी उत्पादकांसमोर अनेक अडचणी आल्या आहेत. आधीच केळी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अडवणुकीची भूमिका घेतली. यानंतर अलीकडच्या काळात केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक निराश झाले आहेत. यातच आता वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

हेही वाचा : नाशिकमध्ये गाळमिश्रित पाणी पुरवठा संभव; सहा धरणे कोरडी, जिल्ह्यातील धरणसाठा १६ टक्क्यांवर

जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्याने फत्तेपूर, देऊळगाव, कापूसवाडी, पळासखेडा यांसह तालुक्यातील अनेक गावांतील घरांसह गोठ्यांचे आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे उडालेल्या पत्र्यामुळे गोठ्यातील जनावरे गंभीर जखमी झाली. रावेर येथील तहसीलदार तहसीलदार बंडू कापसे यांनी नुकसानग्रस्त केळीबागांची माहिती जाणून घेतली. मुक्ताईनगर तालुक्यात आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, जामनेर तालुक्यात मंत्री गिरीश महाजन यांनी शेतबांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला. त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांचे निर्देश देतानाच पीकविमा कंपन्यांनी तातडीने याची दखल घेण्याच्या सूचनाही दिल्या. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांनी भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.