नाशिक : उष्णतेच्या लाटेने संपूर्ण जिल्हा तापला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत सहा धरणे कोरडीठाक झाली असून अन्य सहा धरणेही तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. मे अखेरीस जिल्ह्यातील धरणसाठा १६.३७ टक्क्यांवर आला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ टक्के जलसाठा आहे. पाणी पातळी खालावल्याने शहराला गाळमिश्रित पाणी पुरवठ्याची शक्यता आहे.

पावसाअभावी यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला नव्हता. समन्यायी वाटपाच्या तत्वावर काही धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले. धरणातील जलसाठा कमालीचा घटल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. पावसाला विलंब झाल्यास टंचाईचे संकट भयावह स्वरुप धारण करण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या १० हजार ७४७ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण दुप्पट म्हणजे २० हजार १२२ दशलक्ष घनफूट होते. सद्यस्थितीत ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, माणिकपूंज, नागासाक्या ही धरणे कधीच कोरडीठाक झाली आहेत. भावली धरणात जेमतेम पाणी आहे. आळंदी (२.५७ टक्के), वाघाड (३.७४), वालदेवी (६.७१), केळझर (१.०५), चणकापूर धरणात (४.८६ टक्के) जलसाठा आहे. ही सहा धरणे कधीही रिक्त होतील, अशी स्थिती आहे.

हेही वाचा…तेजस गर्गेच्या मुंबईतील घराची तपासणी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये निम्मा जलसाठा आहे. काश्यपी धरणात १५८२ दशलक्ष घनफूट (२३ टक्के), गौतमी गोदावरी २०७ (११), पालखेड ५३ (आठ), करंजवण ७२९ (१३), दारणा १६०९ (२२), मुकणे १००४ (१३), कडवा १५७ (नऊ), नांदूरमध्यमेश्वर २५३ (९८), हरणबारी ९४ (आठ), पुनद ४९७ (३८) आणि गिरणा धरणात ३८०७ दशलक्ष घनफूट (२० टक्के) असा जलसाठा आहे.

हेही वाचा…गुजरातमधील अपघातात नाशिकच्या तीन मजुरांचा मृत्यू

गंगापूर धरणात २८ टक्के जलसाठा

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १५८२ दशलक्ष घनफूट म्हणजे २८ टक्के जलसाठा आहे. गेल्या जानेवारीत शहरात पाणी कपात लागू करण्याची तयारी महापालिकेने केली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे हा विषय प्रलंबित ठेवला गेला. या काळात देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहर वा काही विशिष्ट भागातील पाणी पुरवठा वारंवार बंद ठेवला जातो. शनिवारी याच कारणास्तव संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. धरणातील पातळी खालावल्यास तळाकडून पाणी उचलले जाते. त्यामुळे शहरात गाळमिश्रित पाणी पुरवठा होतो. यावेळी काहिशी तशीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या संदर्भात पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.