जळगाव :पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील लहान-मोठ्या सर्व नाल्यांची सफाई नुकतीच पूर्ण करण्यात आली. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे २५ लाख रुपये खर्चही केले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने नाल्यांमधून निघालेल्या गाळाची व्यवस्थित विल्हेवाट न लावता तो थेट रस्त्यावर टाकून दिल्याने रहदारीस अडथळा व दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे.
जळगाव शहरातील बहुतांश नाल्यांची रूंदी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने अलीकडे खूपच कमी झाली आहे. परिणामी, पावसाळ्याच्या दिवसात थोडाही पाऊस पडला तरी नाल्यांमधील पाणी आजुबाजुच्या घरांमध्ये शिरण्याचे प्रकार नेहमीच घडतात. पावसाळ्याचे वेध लागल्यानंतर महापालिका प्रशासन दरवर्षी नाले सफाईचे काम हाती घेते. त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही खर्च केला जातो.
यंदाही नाले सफाईसाठी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे; परंतु असे असले तरीही अनेक ठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून नाल्यांमधील गाळ एक तर रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आला आहे. किंवा काही ठिकाणी काढलेला गाळ हा नाल्यांच्या काठावरच पडलेला आहे. नाल्यांमधून निघालेल्या गाळाची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती. आणि गाळ सखल भागात टाकण्याच्या सूचना संबंधिताला देण्यात आल्या होत्या. मात्र, कंत्राटदाराने गाळ काढल्यानंतर तो रहदारीच्या रस्त्यांलगत तसेच मोकळी जागा दिसेल तिथे टाकून दिला. ज्यामुळे परिसरातील नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराविषयी महापालिकेचे प्रशासन मात्र अनभिज्ञच आहे.
शहरातील नाल्यांची सफाई करताना ज्या ठिकाणी कायम पाणी साचते, तिथे निघालेला गाळ टाकण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या होत्या. रस्त्यावर गाळ टाकल्याचे दिसून आल्यास तो उचलण्यासाठी कंत्राटदाराला तातडीने कामास लावले जाईल. – उदय पाटील (सहायक आयुक्त, महापालिका, जळगाव)