नाशिक : गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीज जोडण्या व तत्पर वीजसेवा देण्यासाठी महावितरणची स्थानिक यंत्रणा सज्ज आहे. गणेशोत्सव मंडळांनी घरगुती दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. तसेच उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी गणेश मंडळांना तात्पुरती वीज जोडणी देण्याची कार्यवाही जलदगतीने झाली पाहिजे असे निर्देश दिलेले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासह इतर काही अडचणी असल्यास मंडळांना त्यासाठी सहकार्य करावे. जेथून नवीन वीज जोडणी दिली जाईल, अशा सर्व रोहित्रांची व मिरवणूक मार्गावरील वीज यंत्रणेची पाहणी करावी व आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्ती करावी. तसेच गणेश मंडळांच्या सुरक्षा ठेवीची रक्कम बँक खात्यात परत करण्याची कार्यवाही गणेशोत्सवानंतर लवकर पूर्ण करावी, यामध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले आहे.
गणेशोत्सवात अधिकृतपणे वीजजोडणी घ्यावी काही ठिकाणी अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. गणेशोत्सवात शॉर्टसर्कीट, वायरिंगमध्ये बिघाड आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तातडीच्या मदतीची गरज भासल्यास १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
उपायांमध्ये तडजोड नको…
पावसाची शक्यता असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी गणेश मंडळांनी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडप व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. मंडपातील वीज यंत्रणेची अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे आवरण खराब झाल्यास अशा वायर्समधून लोखंडी पत्र्यात किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत. बटणपट्टीच्या मागे लाकडी फळी लावल्याची खात्री करावी. गणेशोत्सवात वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. पाऊस व वाऱ्यामुळे मंडपातील वीज यंत्रणेसह रोषणाईच्या वायर्स खाली झुकलेल्या नाही किंवा विस्कळीत झालेल्या नाहीत, याची दैनंदिन तपासणी करावी. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडळांनी वीज सुरक्षा उपायांमध्ये तडजोड करू नये, असे महावितरणने म्हटले आहे.