जळगाव – तालुक्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून झालेल्या जोरदार हाणामारीत रविवारी एकाचा मृत्यू होऊन ११ जण जखमी झाले होते. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी जळगावात महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.

एकनाथ गोपाळ (५५) असे हाणामारीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बिलवाडी येथील गोपाळ आणि पाटील परिवारांमध्ये काही वर्षांपासून वाद आहेत. शनिवारी रात्री गोपाळ परिवारातील एका व्यक्तीची दुचाकी पाटील परिवारातील काही तरुणांनी अडविल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाले होते. रविवारी दुपारी एकनाथ गोपाळ आणि त्यांच्या परिवारातील सदस्य ग्रामपंचायतीच्या बांधकामावर रोजगारासाठी गेले होते. त्याच ठिकाणी पाटील परिवारातील काही सदस्य आले. दोन्ही गटांत पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बांधकाम साहित्य, फावडा आणि लाकडी दांड्याचा वापर करण्यात आला.

हाणामारीच्या घटनेत एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय, दोन्ही कुटुंबांतील ११ जण जखमी झाले. त्यात किरण पाटील (२८), मिराबाई पाटील (४५), ज्ञानेश्वर पाटील (४०), दीपक पाटील (२३), संगीता पाटील (४०) आणि दुसऱ्या गटातील जनाबाई गोपाळ (५५), एकनाथ गोपाळ (३५), गणेश गोपाळ (२३), भीमराव गोपाळ आणि कमलेश पाटील (२६) यांचा समावेश आहे. या प्रकरणी जळगावमधील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत रूग्णालय परिसरात काही काळ गोंधळ घातला होता. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशीही भूमिका त्यांनी घेतली होती.

दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला असला तरी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. सोमवारी मृत एकनाथ गोपाळ यांचे नातेवाईक तसेच बिलवाडीचे ग्रामस्थ यांनी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन दिले. यावेळी हाणामारीच्या घटनेतील १० संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी बिलवाडी ग्रामस्थांना दिली.