नाशिक – उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर १६ जूनपासून शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा उत्साही आणि आनंदमयी वातावरणात होण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा शालेय प्रवेशोत्सवात लोकप्रतिनिधींना सहभागी करण्यात येणार असल्याने संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या माध्यमांच्या काही शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरु झाल्या आहेत. परंतु, बहुसंख्य शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरु होणार आहे. शिक्षण विभाग तसेच संबंधित शाळांच्या वतीने दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आखण्यात येतात. यंदाही शिक्षण विभागाच्या वतीने शाळेचा पहिला दिवस उत्साहात, आनंदात जाण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

यंदा शासनाच्या वतीने नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सवासह शंभर शाळांना भेटी देणे, या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, विविध विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच तालुकास्तरावरील अन्य शासकिय यंत्रणेतील प्रथम आणि द्वितीयश्रेणीचे अधिकारी यांनी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शाळांमधील गजबज पहिल्याच दिवशी वाढणार आहे.

शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय होण्यासाठी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेश, एक जोडी बूट, दोन जोडी पायमोजे असे साहित्य शाळा व्यवस्थापन समितीकडून उपलब्ध करून देण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने शाळा व्यवस्थापनाच्या वतीने शाळा स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, स्वच्छतागृह, मैदाने आदींची स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय मोफत पुस्तके शाळा स्तरावर मिळवली जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थी पहिल्या दिवशी गैरहजर राहू नये, यासाठी शिक्षक गृहभेटी घेत विद्यार्थी आणि पालकांशी चर्चा करीत आहेत नवीन शैक्षणिक वर्षाला १६ जूनपासून सुरुवात होत असल्याने पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा जावा, याकरिता शिक्षण विभाग आणि संबंधित शाळांच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात तयारीला वेग देण्यात आला आहे. शाळांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारीवर्ग पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत.