लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : अक्षय्य तृतीया अर्थात आखाजीच्या दिवसापासून आंब्याचा आस्वाद घेत आमरस खाण्यास सुरुवात होते. यंदा आंब्याची चव महाग झाली आहे. शहराच्या बाजारपेठेत आदिवासी भागातून आंबा अद्याप आलेला नाही. अवकाळी पाऊस, बदलते हवामान याचा फटका जिल्ह्यातील आंबा पिकाला बसला. बहुतांश भागात आंब्याचा मोहर गळाल्याने उत्पादनातही घट झाली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील आंबा अद्याप पिकला नसल्याने नाशिककरांना कर्नाटक, कोकण या ठिकाणांहून येणाऱ्या आंब्यांवर अवलंबून राहावे लागले आहे. आदिवासी भागातील आंबा नाशिकच्या बाजारपेठेत येण्यासाठी अजून आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. युवा पिढी आंबा बाजारात येताच खाण्यास सुरुवात करत असली तरी अजूनही ज्येष्ठ मंडळी अक्षय्य तृतीयेपासूनच आंबा खाण्यास सुरुवात करते. आंबा बाधू नये, आणि अक्षय्यतृतीयेपर्यंत आंबा पिकतो, हे त्यामागील कारण आहे. नाशिकच्या बाजारपेठेत कोकणातून रत्नागिरी, पनवेल, देवगड, सिंधुदुर्ग येथून हापूस आंबा दाखल होतो. हापूसच्या आकारानुसार पेटीचा भाव ठरतो. हापूसचा महागडा आवाका लक्षात घेता खवय्यांकडून केशर, लालबाग किंवा अन्य आंब्यांची निवड केली जाते. यंदाही नाशिकच्या बाजारपेठेत कोकणचा आंबा दाखल झाला असून अडीच ते तीन हजार पेटी दराने आंब्याची विक्री होत आहे.

आणखी वाचा-गंगापूर धरणातील गाळ उपशाचे काम थांबविण्याचा निर्णय

नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा येथूनही मोठ्या प्रमाणावर आंबा नाशिकच्या बाजारपेठेत दाखल होतो. त्यात कर्नाटक, गुजरातमधील हापूससह केशरही असतो. रत्नागिरी हापूसपेक्षा या आंब्यांचा दर कमी असल्याने बऱ्याचदा ग्राहकांकडून या आंब्याला पसंती मिळते. यंदा मात्र बदलते हवामान, अवकाळी पाऊस याचा फटका ग्रामीण भागातील आंब्याला बसला आहे. आंब्याची आवक कमी झाली असून अद्याप पुरेशा प्रमाणात आंबा दाखल झालेला नाही.

याविषयी पेठ येथील आंबा उत्पादक संजय पादेर यांनी माहिती दिली. अवकाळी पावसाचा फटका आंबा शेतीला बसला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंबा चांगला आहे. साधरणत: २० किलो आंबा १७०० रुपये याप्रमाणे विकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचे अंतर पेठपासून अधिक असल्याने हा आंबा गुजरातकडे विकण्यासाठी नेण्यात येत असल्याचे पादेर यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील देवचंद महाले यांनी, अवकाळी पावसामुळे मोहर झडल्याने हाताशी आलेले आंबा पीक गेल्याची व्यथा मांडली. २० ते ३० जाळ्या कच्चा आंबा कमी दराने विकला. याशिवाय मोहर वेगवेगळ्या टप्पात येत असल्याने अजून बराचसा आंबा पिकला नसल्याने तो विक्रीसाठी काढता येत नसल्याचे सांगितले. अक्षय्य तृतीयेला दरवर्षी नाशिकच्या बाजारपेठेत येणारा आदिवासी भागातील आंबा यंदा अजूनही आलेला नाही.

आणखी वाचा-नाशिक : विवाहितेचा दोन मुलींना गळफास, नंतर आत्महत्या

कारणे काय?

अवकाळी पाऊस, बदलते हवामान याचा फटका जिल्ह्यातील आंब्याला बसल्याने उत्पादनात घट झाली. आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा येथूनही मोठ्या प्रमाणावर आंबा नाशिकच्या बाजारपेठेत दाखल होतो. रत्नागिरी हापूसपेक्षा या आंब्यांचा दर कमी असल्याने बऱ्याचदा ग्राहकांकडून या आंब्याला पसंती मिळते. यंदा अजूनही, पुरेशा प्रमाणात आंबा बाजारात दाखल झालेला नाही. पेठ तालुक्यातील अनेक उत्पादक नाशिकपेक्षा गुजरातला माल पाठवित आहेत. सध्या नाशिकमध्ये कोकणातील हापूस दाखल झाला असून त्याचे दर अधिक असल्याने कर्नाटकातून येणाऱ्या हापूसला पसंती देणे भाग पडत आहे.