नाशिक – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविली जात असून यात संशयास्पद माव्यापासून तयार करण्यात येणारी मिठाई व भेसळयुक्त दुग्धजन्य अन्न पदार्थाच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दुग्धजन्य अन्नपदार्थांसोबतच इतर अन्न खरेदी करतांना नागरिकांनी सजगता बाळगणे महत्वाचे असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी थेट जर्मनीतील लोकांकडून घेतल्या जाणाऱ्या खबरदारीचा दाखला देत भारतीयांशी तुलना केली.
अन्न व औषध प्रशासन आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चअर्स असोसिएशन (निमा) यांच्यावतीने निमा हाऊस येथे आयोजित ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, अन्न व औषधे प्रशासन सहआयुक्त दिनेश तांबोळी, सहाय्यक आयुक्त मनिष सानप, विनोद धवड, अश्वमेध प्रयोगशाळेच्या डॉ. अपर्णा फरांदे, निमाचे उपाध्यक्ष मनिष रावल यांच्यासह उद्योजक, क. का. वाघ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
निमाचे अध्यक्ष नहार यांनी मनोगतात उद्योगास चालना देण्यासाठी शहरात सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याचे नमूद केले. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत अन्न व औषध प्रशासनाचे नवीन कार्यालय सुरू करण्यासह नवीन उद्योग नाशिकमध्ये आणण्यास प्रशासनाचे पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर डॉ. फरांदे यांनी आहारातील विविध पोषणद्रव्यांचे महत्व, त्याअभावी होणारे विकार यांची माहिती दिली.
यावेळी मंत्री नरहरी झिरवळ यांनी अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे व अन्न व सुरक्षा मानके कायद्याचे महत्व यांची शहरासह ग्रामीण भागात प्रबोधनपर कार्यक्रमातून प्रभावी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. दुग्धजन्य अन्नपदार्थांसोबत इतर खाद्य पदार्थ खरेदी करतांना नागरिकांनी सजगता बाळगणे महत्वाचे आहे. नागरिकांना बहुतांश अन्न पदार्थ भेसळयुक्त आहेत किंवा कसे, ही तपासणी घरगुती स्तरावर करता येणे शक्य आहे. जर्मनीतले लोक बाहेरून आणलेल्या सर्व वस्तू तपासून खातात. आपण फक्त गोळ्या तपासून खातो असे झिरवाळ यांनी सांगताच सभागृहात हास्य पसरले. अन्न हे औषध म्हणून खाण्याची गरज आहे. तसे न केल्यास औषध हे अन्न म्हणून खावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.