नाशिक – गुन्हेगारांच्या तोंडून नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले जात असतांना आता वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने शहरात शनिवारपासून ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेतली.
मागील आठवड्यात एका रिक्षा चालकाने गर्दीच्या ठिकाणी महिलेला मारहाण केली होती. त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा उघड झाली. या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने उपआयुक्त किरिथिका यांनी शहरातील मध्यवर्ती भाग आणि बाजारपेठ परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांविरुध्द मोहीम सुरु केली.
बेशिस्त रिक्षाचालकांना नियमांचे पाठ शिकवण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये रिक्षा चालकाचे नाव, परवाना धारकाचे नाव, परवाना क्रमांक, बॅच, चालकाचा परवाना क्रमांक रिक्षाच्या आतील बाजूने प्रवाशांना दिसेलस अशा ठिकाणी रिक्षात लावणे बंधनकारक करण्यात आले.
रिक्षा चालकांनी गणवेशात राहावे, तसेच दिलेले बॅच लावावेत. परवाना संपलेल्या व तांत्रिकदृष्टया अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवतांना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. धोकादायक पध्दतीने रिक्षा चालविणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतुक विभागाच्या वतीने शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, शालिमार, सीबीएस सिग्नल, सिटीसेंटर मॉल, आनंदवल्ली, सारडा सर्कल, राजदू हाॅटेल, कॅनडा कॉर्नर आणि बाजारपेठ परिसरासह अन्य ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.
प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांबरोबर वाहतूक नियंत्रण व तपासणी पथके नियुक्त करत कारवाई करण्यात येणार आहे. शहर परिसरात मुख्यमंत्र्यांचा दौरा असतांनाही वाहतूक विभागाच्या वतीने ही कारवाई चालू ठेवण्या आली. काही ठिकाणी रिक्षाचालकांशी वाद झाले. पोलीस उपायुक्त किरथिका सी. एम. यांनी, बेशिस्त रिक्षाचालकांविरुथ्दची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.
शहरातील रविवार कारंजा, शालिमार तसेच नाशिकरोड परिसर या ठिकाणी रिक्षाचालकांची मुजोरी असते. दुचाकी असो वा चारचाकी वाहनांना कट मारणे, प्रवाश्यांशी हुज्जत घालणे, वाहतूक विभागाची कारवाई सुरू असल्यास ही कारवाई टाळण्यासाठी मिळेल त्या मार्गाने रिक्षा नेतांना वेगाचा तसेच प्रवाश्यांचा सुरक्षेचा त्यांना विसर पडतो.
