नाशिक : राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असावा. मात्र, राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, असे प्रत्युत्तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. महाराजांनी महायुतीकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळू न शकलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे दिनकर पाटील यांची शुक्रवारी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. भुजबळांना तर त्यांनी बादली हे आपले चिन्ह भेट स्वरुपात दिले.

नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने चुरशीची झाली आहे. त्यांच्या माघारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले. अलीकडेच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अनिष्ठान केव्हाही वरचे असते, महाराजांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असले पाहिजे, असे सुचविले होते. त्यास उत्तर देताना महाराजांनी राजकारणात आलो म्हणजे आपण अध्यात्म सोडलेले नसल्याचे सांगितले. राजकारणात अध्यात्माचे तत्व रुजविण्यासाठी या क्षेत्रात आल्याचे स्पष्ट केले. महायुतीत नाशिकच्या जागेवरून तीनही पक्षात वाद झाले होते. अखेरीस शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली.

हेही वाचा…नाशिक : वादळी पावसाने घरे, कांदा चाळीचे नुकसान; झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत

उमेदवारीच्या स्पर्धेत राहिलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याकडे सध्या महाराजांचा कल आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांची भेट घेतल्यानंतर महाराजांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेऊन चर्चा केली. मतदारांच्या गाठीभेटी घेणे हे उमेदवाराचे कर्तव्य असल्याचे महाराजांनी नमूद केले. बादली हे चिन्ह भेट दिल्यावर भुजबळांना अतिशय आनंद झाला, बादली खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत भुजबळांकडून मदत मागण्याची गरज नाही. कुठलीही निवडणूक असो, ते आम्हाला भेटत असतात, असे महाराजांनी सूचित केले. या भेटीवर भुजबळांनी फारसे भाष्य केले नाही. निवडणुकीत उमेदवार सर्वांच्या गाठीभेटी घेत असतात. यात काहीही वावगे नसल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा…नरहरी झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव

सध्याचे राजकारण चिंतेचा विषय झाला आहे. राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी तरुणांना व्यसनाच्या आहारी लावत आहेत. अनेक प्रकारचे प्रलोभन दाखवत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. हे कृत्य लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करुन शांतिगिरी महाराजांनी चांगल्या मार्गाने निवडणूक लढता येते हे जय बाबाजी भक्त परिवार सिध्द करीत असल्याचे सांगितले. राज्यात नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, दिंडोरी, शिर्डी आदी सात लोकसभा मतदारसंघात आपला भक्त परिवार निर्णायक भूमिकेत आहे. या मतदारसंघात नागरिकांनी समाजहित, धर्महित व देशहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.