नाशिक : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवा वेगवान करण्यासाठी नाशिक एल -२ पार्सल हबचे एल वन पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील टपाल पार्सल सुविधा अधिक वेगवान होणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून चार जानेवारी रोजी नाशिकमधील टपाल विभागाच्या इंट्रा सर्कल हबचे नॅशनल सॉर्टिंग हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यात आले. त्यामुळे जलद टपाल सुविधा अधिक वेगवान झाली. या धर्तीवर मेल आणि पार्सल ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट नेटवर्क अंतर्गत नाशिक पार्सल हबचे देखील श्रेणीवर्धन करण्यासाठी भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. सर्व गोष्टींचा विचार करून २३ सप्टेंबर २०२४ रोजी भुजबळ यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे याबाबतची मागणी केली होती.
यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा पत्र लिहिले होते. त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाशिक एल- २ पार्सल हबचे एल वन पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळाली आहे.
देशात सध्या कार्यरत असलेल्या १०९ पार्सल हबपैकी ७९ पार्सल हबच्या श्रेणीत बदल करणे प्रस्तावित होते. त्यांपैकी एल- २ पार्सल हब प्रकारातून एल वन प्रकारात श्रेणीवर्धन होण्याचा मान मिळविणारे नाशिक हे एकमेव एल- २ पार्सल हब ठरले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या धोरणानुसार देशात एल वन पार्सल हबची कमाल संख्या ४५ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या श्रेणीवर्धनाच्या निमित्ताने देशातील निवडक ४५ एल वन पार्सल हबमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. या ४५ पैकी संपूर्णपणे स्वयंचलित व अद्ययावत असणाऱ्या ४० पार्सल हबमध्ये देखील नाशिकचा समावेश झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील अशा प्रकारे एल वन दर्जा मिळालेले मुंबई, पुणे आणि नागपूर पार्सल हब हे टपाल विभागाचे क्षेत्रीय कार्यालय आहे. मात्र विभागीय कार्यालय असतानादेखील नाशिक हे एल वन प्रकारात श्रेणीवर्धीत करण्यात आलेले महाराष्ट्रातील एकमेव पार्सल हब आहे.
या निर्णयामुळे सदर श्रेणीवर्धीत नाशिक रोड स्थित एलवन पार्सल हबसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि स्वयंचलित व अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नाशिक एल – २ पार्सल हबचे एल वन पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन झाल्यानंतर अधिक वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीतही घट होणार आहे. आता धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यांमधील पाठवले जाणारे व येणारे पार्सल यापूर्वी मुंबईला जात असत, ते आता मुंबईला न जाता थेट नाशिकमधूनच पाठवले जातील व येतील. ई वाणिज्य कंपन्या ग्रामीण भागातील पार्सल सुविधेसाठी टपाल विभागाशी करारबद्ध असून या निर्णयामुळे त्यांचे पार्सल देखील नाशिकच्या ग्रामीण भागात अधिक वेगाने पोहचणे शक्य होणार आहे.
