जळगाव : दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नसते. संरक्षण तालीमपेक्षा तपासणी मोहीम राबवून दहशतवादी पकडा, अशी प्रतिक्रिया मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरवर व्यक्त केल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना शोधायला ते जातील ना, असा टोला त्यांनी हाणला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरूवारी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईचे समर्थन केले. तसेच दहशतवाद्यांना शोधून शिक्षा करावी, असे वक्तव्य करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लक्ष्य केले.
भारत हा योध्दांचा देश आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गरज होती, त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते कार्य केले आहे. प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल, असे चित्र सध्या देशात आहे. देशावर परकीय आक्रमण झाले तर प्रत्युत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे, हा संदेश त्यातून दिला गेला. पंतप्रधानांनी हवाई हल्ला करून देशाला अभिमान वाटेल, असेच पाऊल उचलले आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याविषयी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, निवडणुका या होत राहतील, पण आमची प्राथमिकता सध्या देश आणि शेतकरी यांना असल्याचे सांगितले.