नाशिक : लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश आणि विधानसभा निवडणुकीत मात्र दारूण पराभव महाविकास आघाडीत अशी दुहेरी अनुभूती घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने नाशिक महापालिका निवडणूक आता स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. युती वा आघाडीच्या फंद्यात न पडता महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची आहे. त्यामुळे सर्व प्रभागात पूर्ण ताकतीने तयारीला लागा, असे निर्देश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रथमच मुंबई येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागात ठाकरे गटाला मोठा झटका बसला. त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले. यामध्ये नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि देवळाली या शहरातील तीनही मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून जो लाभ झाला, तो विधानसभेत झाला नाही. या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचे शिवसेना ठाकरे गटाने ठरवले आहे. मुंबईतील बैठकीत पक्षप्रमुख ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढायची असल्याचे स्पष्ट केले, असे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

हे ही वाचा… योग्य मोबदला न मिळाल्यास रेल्वेमार्गासाठी जमीन न देण्याचा इशारा

हे ही वाचा… मनपा आयुक्तांचे उद्यान विभागावर ताशेरे उद्याने, जॉगिंग ट्रॅकला बकाल स्वरुप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणूक निकाल आपल्याला मान्य नसले तरी कारणमिंमासा करण्याची ही वेळ नाही. पदाधिकाऱ्यांनी उदासिनता झटकून पूर्ण ताकतीने महापालिकेची तयारी करावी, असे ठाकरे यांनी सूचित केले. बुथप्रमुख ते शाखाप्रमुखापर्यंत नियोजन करा. नागरिकांच्या भेटीगाठी घ्या. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला स्वबळावर लढायची आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रभागात संघटना मजबूत करून तयारीला लागण्याची सूचना ठाकरे यांनी केल्याची माहिती बडगुजर यांनी दिली. मुंबईतील या बैठकीत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.