लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सोमवारी संध्याकाळी वादळी पावसामुळे आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

यावर्षी वातावरणातील बदलामुळे आधीच आंबाबागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना प्रयत्न करुन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ३० ते ४० टक्के बागा वाचविण्यात यश आले होते. सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कैऱ्या गळून पडल्या. हरसूलसह ठाणापाडा, निरगुडे, खरशेत, दलपतपूर, तोरंगण, चिरापाली, चिंचवड, जातेगाव तसेच दुर्गम भागात खरवळ, आडगाव (देवळा), गावठा, शिरसगाव, मुरंबी या गावांमध्ये नुकसान झाले.

आणखी वाचा-नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी

ठाणापाड्यातील सामाजिक कार्यकर्ते जयराम भुसारे यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सूचना केल्या आहेत. प्रत्येकाने नुकसानीचे फोटो काढून कृषी आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागील वर्षीही या परिसरात अवकाळी आणि वादळामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु, अल्प शेतकऱ्यांचे पंचनामे झाले. काही त्यापासून वंचित राहिले.