लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मिरमधील विमान प्रवासाचे संपूर्ण चित्र पालटले आहे. श्रीनगर ते मुंबई प्रवासासाठी ३० ते ४० हजार रुपये तिकीट आकारणी होत आहे. अशा स्थितीत सहलीचे नियोजन करणाऱ्या व्यवस्थापकांनी ऐनवेळी हात वर केल्याची अनुभूती नाशिकच्या भाऊ-बहिणीला आली. प्रवासी विमान कंपन्यांच्या दरवाढीची झळ अनेकांना सहन करावी लागत आहे. लढाऊ विमानांचे उत्पादन करणाऱ्या ओझरच्या हिंदु्स्तान एरोनॉटिक्स (एचएएल) कंपनीतील अभियंत्यांसह कुटुंबियही त्यास अपवाद ठरले नाहीत.
जम्मू-काश्मिरमध्ये भ्रमंतीसाठी गेलेल्या पर्यटकांमध्ये पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भीतीचे सावट पसरले आहे. अनेकांनी तिथून बाहेर पडण्यास सुरुवात केल्यामुळे विमान तिकिटांचे दर कित्येक पटीने वाढले. जम्मू-काश्मिरमध्ये अडकलेल्या स्थानिकांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध घेतला गेला.
सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत ६० नाशिककर जम्मू काश्मिरमध्ये अडकून पडल्याचे समोर आले. यात ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीतील तीन अभियंते आणि त्यांचे कुटुंबिय असे आठ तर, राणेनगर येथील संगणकीय अभियंता सिद्धी मुसळे आणि भाऊ सोहम मुसळे असे १० जण श्रीनगरमधील हॉटेलमध्ये सुखरुप आहेत. त्यांच्यासह अनेकांच्या परतीच्या विमानाची तिकीटे दोन, चार दिवसानंतरची असल्याने तोपर्यंत संबंधितांना प्रतिक्षा करावी लागू शकते. कारण, विमान तिकीटाचे दर प्रचंड वाढले असून ते मिळण्याची शक्यता धूसर बनल्याचे सांगितले जाते.
सहल व्यवस्थापकाकडून असहकार्य
बुधवारी सकाळी आम्ही गुलमर्गवरून निघालो. संध्याकाळी पहेलगामला पोहोचणार होतो. वाटेतच तिकडे दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. आणि आम्हाला श्रीनगरला माघारी फिरावे लागले. नाशिकमधील सॉफ्टवेअर अभियंता सिद्धी मुसळे आणि भाऊ सोहम मुसळे यांची ही प्रतिक्रिया. सहलीच्या नियोजनानुसार शुक्रवारी सायंकाळी त्यांचे परतीचे विमान तिकीट आहे. लवकर घरी जायचे असल्याने आम्ही तत्पूर्वीच्या विमान तिकिटाचे नियोजन करावे, अशी विनंती सहल व्यवस्थापकाला केली. पण, त्याने हात वर केले. तुमच्याकडून होत असेल तर करून घ्या, असा सल्ला दिल्याचे सिद्धी मुसळे यांनी लोकसत्ताला सांगितले. गुरुवारचे तिकिट ३० ते ४० हजार रुपयांना असल्याकडे सिद्धी यांनी लक्ष वेधले.
एचएएलचे अभियंता श्रीनगरमध्ये सुरक्षित
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथील अभियंता मिलिंद गवई आणि अन्य दोन सहकारी असे तीन कुटुंबिय रविवारी जम्मू-काश्मिरमध्ये पोहोचले होते. पहेलगाम येथील हल्ल्यानंतर या तीन कुटुंबातील आठ सदस्य श्रीनगरमध्येच थांबले आहेत. सहलीच्या नियोजनानुसार गुरुवारी आम्ही पहेलगामला जाणार होतो. परंतु, मंगळवारी सोनमर्गवरून परतताना पहेलगामच्या हल्ल्याची माहिती समजली. आम्ही श्रीनगरमधील हॉटेलमध्ये सुरक्षित आहोत. श्रीनगरमध्ये बुधवारी दुकाने बंद होती. पण पर्यटक भ्रमंतीसाठी येत असल्याचे आश्वासक चित्र पहायला मिळाल्याचे स्मिता गवई यांनी सांगितले. शनिवारी संबंधितांची परतीच्या विमानाची तिकीटे आहेत. तत्पूर्वी तिकीट मिळेल का, याची चाचपणी करण्यात आली. पहेलगामला जाता येणार नसले तरी वैष्णोदेवी, कटरासह आसपासच्या स्थळांना भेट देण्याचे नियोजन असल्याचे स्मिता गवई यांनी म्हटले आहे.