नाशिक: प्रशासकीय पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतांना कधी आर्थिक चणचण तर, कधी नात्यातच कमी खर्चात, समाजातील असुरक्षितता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे बालविवाह होत असतात. केवळ मुलीच नव्हे तर, मुलेही बालविवाहाच्या कूप्रथेत भरडले जात आहेत. स्थानिक पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल विकास समितीच्या सजगतेमुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील दोन बालविवाह रोखण्यात महिला व बाल कल्याण विभागाला यश आले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. जिल्हा प्रशासनाने ग्राम बाल विकास समितीच्या मदतीने या कूप्रथेला नियंत्रणात आणण्यासाठी काम केले. मागील आठवड्यात १८ वर्ष पूर्ण केलेल्या मुलाचा बाल विवाह थांबविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या १०९८ क्रमांकावर इगतपुरी तालुक्यातील धारगावजवळील खाडीची वाडी येथे २१ मे रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीनुसार समितीचे सदस्य ग्रामसेवक तसेच सचिव, अंगणवाडी सेविका मुलीच्या घरी पोहचल्या. मुलीचे आधारकार्ड पाहिले असता ती १६ वर्ष ११ महिन्यांची असल्याचे लक्षात आले. संबंधितांनी समितीला विरोध केला. परंतु, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या मदतीने हा विवाह रोखण्यात आला. पालकांना समज देण्यात आली. तसेच बाल कल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरी घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. हरसूलजवळील चिंचवड गावातील एका अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीचे लग्न २१ मे रोजी होते. यासंदर्भातील कार्यक्रमात लहान्या मुलीच्या स्थळासाठीही होकार आला. एकाच दिवशी दोन्ही मुलींची लग्न करण्याचे पालकांनी ठरवले. समितीने जेव्हा त्या ठिकाणी पाहणी केली, तेव्हा पालकांनी मोठ्या मुलीचे लग्न असल्याचे सांगितले. परंतु, हळद व अन्य विधीच्या ठिकाणी लहान मुलगी बसल्यावर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकांचा कावा ओळखत त्यांना समज दिली. समितीच्या सजगतेमुळे दोन बालविवाह रोखले गेले.