लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांविषयी बोलतात. मात्र राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही, असा प्रश्न माजीमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले.

रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य केले होते. या अनुषंगाने येथे प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली. त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीचे फार मोठं काम केले. त्यामुळे पवार यांनी महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसे काम फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेण्यात वावगे काय, अशी विचारणा भुजबळ यांनी केली.

आणखी वाचा-धुळ्यात नितेश राणे यांच्या विरोधात युवा सेनेचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात. तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणी देखील ते करत असतात. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पवार यांनी उपरोक्त बाबी स्पष्ट केल्या होत्या, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही असून ती मी वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेतले तर योग्य राहील, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.