उरण : नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन अवघ्या आठवडा भरावर आले आहे. त्यामुळे नामकरणाचा प्रश्न ही ऐरणीवर आला असून यासाठी आंदोलनाची घोषणा झाली असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी दि. बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समितीच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी आमंत्रित केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे. ही बैठक दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव जाहीर करणारी अधिसूचना काढण्याची घोषणा करण्याची प्रमुख मागणी केली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास पुढील निर्णय घेतला जाईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ६ ऑक्टोबरच्या होणाऱ्या मोर्चा संदर्भात समिती मुख्यमंत्र्यांच्या बैठकी नंतर भूमिका जाहीर करील असेही म्हटले आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे भूमिपुत्रांचे लक्ष लागून राहिले आहे.
जस जसे विमानतळाचे उदघाटन नजीक आले आहे. तसे दिबांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या पार्श्वभूमीवर दावे प्रतिदावे आणि शंका कुशंकाना उधाण आले आहे. याच मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी यापूर्वी ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यात केंद्रीय मंत्री मंडळाने उदघाटना पूर्वी विमानतळ नामकरणाची अधिसूचना काढावी अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. तर निर्णय न झाल्यास संघर्ष अटळ असल्याचे संकेत देण्यात आले होते.
नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणाची घटिका समीप आली असूनही नामकरणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या स्थानिक भूमीपुत्राकडून उदघाटना पूर्वी नाव देण्या बाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. तर दुसरीकडे विमानतळाला दिबांचेच नाव देणार असा दावा सत्ताधारी आमदार करीत आहेत. या दावे प्रतिदावे आणि शंका कुशंकाना सद्या नवी मुंबई तसेच उरण पनवेलसह रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर व मुंबई या जिल्ह्यात उधाण आले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दि. बा. पाटील सर्व पक्षीय नामकरण समितीच्या माध्यमातून लढे,चर्चा, निवेदने,जनजागृती आणि आंदोलने सुरू आहेत. या दरम्यानच्या काळात केंद्रीय विमानन मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या कडून विमानतळ नामकरण यासाठी केंद्राकडे केवळ राज्य सरकार कडून आलेला एकमेव दिबांच्या नावाचा प्रस्ताव असल्याचे वारंवार स्पष्ट केले जात आहे.
सुरुवातीला महाविकास आघाडीने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव केला होता. त्याला भाजपा सह काही पक्षांनी विरोध केला होता. भाजपचे उरण व पनवेलचे आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी या सर्वपक्षीय (महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष वगळता) दिबांच्या नामकरणासाठी झालेल्या आंदोलनाला सर्व प्रकारची रसद पुरविली होती.
मात्र याच महाविकास आघाडीचे सरकार अल्प मतात येताच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी दिबांच्या नावाचा नवा प्रस्ताव तयार केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर दिबांच्या नावाचा प्रस्ताव हा ठाकरे सरकारने अल्पमतात असतांना केल्याचे कारण पुढे करीत महायुती सरकारने दिबांच्या नावाचा नवा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारला पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाला विमानातळ सुरू होण्याची जय्यत तयारी सुरू असतांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आता पर्यंत मंजुरी दिलेली नाही.
तर विमानतळाच्या बोर्डिंग पास वर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विमानतळाच्या संरक्षण भिंतीवर ही एनएमआय असा उल्लेख आहे. तर दुसरीकडे पनवेल महानगरपालिके कडून विमानतळावर जाणाऱ्या मार्गाच्या दिशादर्शनासाठी लावण्यात आलेल्या फलकांवर ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नामोल्लेख करण्यात आला आहे. या सर्व घडामोडी नंतर स्थानिक भूमिपुत्रांनी संताप व्यक्त केला जात आहे.
नुकताच भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न उपस्थित करून सरकार कडे उत्तर मागीतले मात्र केंद्र सरकार कडून समर्पक उत्तर आलेले नाही.
दि बा राष्ट्रीय नेते
दिबांनी विधानसभा,राज्याचे विरोधीपक्ष नेते त्याचप्रमाणे दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून काम केले आहे. या त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कसेल त्याची जमीन या कुळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेला संघर्ष, राज्यात स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा, शेतकऱ्यांना जमीन संपादीत केल्यानंतर मोबदला म्हणून विकसित साडेबारा टक्के भूखंड कायदा आणि त्यानंतर २०१३ च्या भूसंपादन आणि पुनर्वसन कायद्यात २० टक्के विकसित भूखंडाची तरतूद, ओबीसीच्या मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात पहिलं आंदोलन दिबांनी सुरू केलं आशा राष्ट्रीय पातळीवरील कार्याचा आलेख दिबांच्या नावी आहे. त्यामुळे दिबा हे राष्ट्रीय नेते आहेत असा दावा आता पुढे केला जात आहे.
दोन आजी माजी खासदार आमने सामने
आगरी समाजाचे माजी खासदार रामशेठ ठाकूर व भिवंडीचे विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे हे नामकरणाच्या मुद्द्यावर आमने सामने आले आहेत. यात सुरेश म्हात्रे हे श्रेय घेण्यासाठी मोर्चा काढत आहेत. असा आरोप रामशेठ ठाकूर यांनी केला आहे. तर मागणी मान्य करण्यासाठी मोर्चा काढणारच असा निर्धार खा. सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.