उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित असल्याने या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नामकरण कृती समितीसोबत बैठक घेण्याची मागणी करण्याचे पत्र समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्याचप्रमाणे विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी दिबांच्या नावाची घोषणा करावी अन्यथा पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलेला ठराव आज तीन वर्षे होऊन गेली तरी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे मुंबई नवी मुंबई, रायगड, ठाणे, नाशिक, पालघर आदी जिल्हयांतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये असंतोषाची भावना पसरली आहे. या विमानतळाचे काम आता पूर्ण होत असून लवकरच हे विमानतळ प्रवाशी वाहतुकीसाठी सुरू होईल. आपण निवडणुकीच्या प्रचार सभेत आश्वासन दिले होते की या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल. परंतु केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विमानतळ सुरू होण्यापूर्वी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी येथील लाखो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची आग्रहाची मागणी आहे.

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव पुढे कार्यान्वित कसा करता येईल व या विमानतळाच्या नोकर भरतीबाबत प्रकल्पग्रस्तांना व भुमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे यावर चर्चा करण्यासाठी आपण आपल्या कार्यालयात विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीच्या सदस्यांबरोबर येत्या १५ दिवसांत बैठक बोलावून शासनाची याबाबत भूमिका स्पष्ट करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या समक्ष भेट घडवून आणावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

विमानतळ सुरू होण्यापूर्वी नामकरणाबाबत अधिसूचना काढावी. विमानतळातील रोजगाराबाबत सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून भुमिपूत्र बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास विलंब झाल्यास स्थानिक भूमिपुत्रांमधील असंतोष वाढीस लागेल व त्याचे आंदोलनात रूपांतर होईल याची गंभीर दखल सरकारने घ्यावी व हा नामांतराचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती या पत्राद्वारे सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केली आहे.

जासई येथे बेमुदत उपोषण

सर्वपक्षीय समितीचे सरचिटणीस कॉ. भूषण पाटील हे मंगळवारी दिबांच्या स्मृतीदिनी त्यांच्या जासई या जन्मगावी असलेल्या पुतळ्यासमोर नामकरणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एकच धून, २४ जून’

मंगळवारी ‘एकच धून, २४ जून’ असा नारा देत मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील नामकरणाच्या समर्थनार्थ कार, बाईक आणि रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. वाशी रेल्वेस्थानकाजवळील सिडको प्रदर्शनी केंद्राजवळून पामबीच मार्गे विमानतळ ते करंजाडे, पनवेल या मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.