पनवेल : पनवेल शहराची तहान भागविणाऱ्या देहरंग धरण क्षेत्रात सोमवारी पडलेल्या मुसळधारांमुळे धरण तुडुंब भरले आणि पनवेलकरांचा पाणीप्रश्न मिटला. पनवेलकर मार्च महिन्यापासून आठवड्याला एक दिवसाच्या पाणीकपातीचा सामना करत आहे. ही पाणीकपात जून महिन्यापर्यंत सुरू राहणार होती. मात्र धरण तुडुंब झाल्याने सोमवारपासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पनवेल महापालिका आयुक्तांनी घेऊन पनवेलकरांना दिलासा दिला आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडल्यामुळे धरण मे महिन्यातर आकंठ भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
दरवर्षी मोसमाच्या पावसानंतर जून अखेरपर्यंत देहरंग धरण तुडुंब भरुन वाहू लागते. या धरणाची क्षमता ३.१२५ घन लक्ष मीटर आहे. या धरणातून पनवेल शहराला दररोज १६ दश लक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी ३२ दश लक्ष लीटर पाण्याची गरज आहे. महापालिका प्रशासन देहरंग व्यतिरिक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून उसनवारीने पाणी घेऊन शहराची तहान भागवते. सोमवारी एका दिवसात २९६ मिलीमीटर पाऊस पनवेल परिसरामध्ये पडल्याने धरण तुडुंब भरुन वाहू लागले.
देहरंग धरणातील पाणी जून महिन्यापर्यंत पनवेल शहरासाठी घेता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यापासून दिवसाला ४ ते ५ दश लक्ष लीटर पाणी घेण्याचे नियोजन केले. पाण्याच्या नियोजनामुळे मार्च महिन्यापासून पाणी कपात लागू केल्यामुळे एमजेपीकडून वाढीव पाणी पुरवठा पनवेल शहराला केला जात होता. सोमवारी मुसळधार धरण क्षेत्रात कोसळल्यामुळे हा पाऊस पनवेलकरांसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा ठरला.
सोमवारी पडलेल्या पावसामुळे पनवेलकरांची पाणी टंचाई दूर झाली. सोमवारपासून पाणी कपात पालिकेने रद्द केली आहे. नागरिकांनी पालिकेचे आभार मानले आणि टंचाईच्या काळात नागरिकांचे सहकार्य महापालिका प्रशासनाला लाभल्याने त्यांचेही आभार पालिका मानते. – विलास चव्हाण, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पनवेल महापालिका