नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २१ परिसरात जुन्या वैरातून काही जणांनी एकत्र येऊन केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. “जुने वाद मिटविण्याच्या” बहाण्याने त्या तरुणाला बोलावून हा हल्ला करण्यात आला. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव किशोर वरक असे असून, तो आपल्या दोन मित्रांसह गंभीर जखमी झाला होता. शनिवारी (११ ऑक्टोबर) वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे तुर्भे परिसरात तणाव निर्माण झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

वाद मिटविण्याच्या नावाखाली सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष मोहन धुर्वे (वय ३१, रा. सेक्टर- २१, तुर्भे) हे नोकरी करणारे आहेत. ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री, साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आशुतोष आणि त्याचे मित्र किशोर वरक व विकी कांबळे यांना “जुने वाद मिटविण्यासाठी” बोलावले. मात्र, तो एक सापळा ठरला.

तेथे पोहोचताच आरोपींनी अचानक तिघांवर जीवघेणा हल्ला चढवला. क्रिकेटची लाकडी बॅट, फायबर रॉड, दगड आणि सिमेंटच्या विटांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात किशोर वरकच्या डोक्यात गंभीर जखम झाली आणि आशुतोष धुर्वेचा हात मोडला, तर विकी कांबळेच्या बरगड्या आणि हातांवर गंभीर दुखापत झाली.

ही घटना लक्षात येताच परिसरातील रहिवाशांकडून जखमींना तत्काळ वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र किशोर वरकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. त्यामुळे संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला आहे.

गंभीर गुन्ह्याची नोंद..

या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, विकी पाटील, संकेत लाड उर्फ लाडू, ओंकार वाघमारे उर्फ गण्या, विघ्नेश घरत, शकील, मौला, चारुशिला (विकी पाटीलची पत्नी) आणि तीन अज्ञात इसम अशा एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात प्राणघातक हल्ला, जखमी करण्याचा प्रयत्न, गटाने गुन्हा करणे, धमकी देणे, आणि मालमत्तेचे नुकसान अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंदविला आहे.

पोलीसांचा तपास सुरू

घटनेनंतर तुर्भे आणि एपीएमसी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली साधने आणि आरोपींचा नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत जुन्या वैरातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपींच्या अटकेसाठी दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.