दोन वर्ष निर्बंधामध्ये दिवाळी साजरी करावी लागलेल्या नागरीकांनी यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करताना सर्व नियम गुंडाळून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. मध्यरात्रीनंतरही फटाक्यांची आतषबाजी व ठणठणाट ऐकायला येत होते. सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेलेल्या दिसतात. त्यामुळे कच-याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे ‍दिसून येते. यंदाच्या दिवाळीच्या कालावधीत वेगवेगळया प्रकारचे फटाके वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात लक्षणीय भर पडते. त्यामुळे पालिकेने शहरातील मुख्य रस्ते चौक येथील साफसफाईसाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवली. परंतू मध्यरात्रीपर्यंत बेफाम उत्साहात दिवाळीचा ठणठणाट सुरु असल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी मनसोक्त दिवाळी साजरी करुन शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून सामूहिक चोपडी पूजन

नवी मुंबई शहराला देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावलौकीक मिळालेला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदशनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिपावली सणाच्या कालावधीत शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्यात आलेले होते. लक्ष्मीपूजनाच्या सणानंतर रात्री ११ वाजल्यापासून बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात स्वच्छतेची विशेष मोहीम २५ ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजेपर्यंत राबविण्यात आली.या विशेष स्वच्छता मोहीमेकरिता ३५६ सफाई कर्मचारी यांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. ८ पिकअप वहाने आणि ८ आरसी वाहने यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीमेत गोळा करण्यात आलेला कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहतूक करून शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी वाहून नेण्यात आला.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ बाबासाहेब राजळे यांच्यासह मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांनी नियोजनबध्द पध्दतीने मोहिम राबवली परंतू शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा, मुख्य चौक अशा गजबजलेल्या ठिकाणी रात्री ११ ते पहाटे ३ या कालावधीत राबविलेल्या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खादयपदार्थ यांचा ओला व कागद, पुठ्ठे, कापड यांचा मोठ्या प्रमाणात सुका कचरा गोळा करून तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.सकाळी दिवस उजाडण्याच्या आत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ही विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली .परंतू शहरात ऐवढी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली की शहरातील मुख्य रस्ते व चौक वगळता अनेक ठिकाणी फटाक्यांच्या कागदाचे ढीग पाहायला मिळाले.

हेही वाचा- नवी मुंबई : धक्कादायक! व्हिडीओ कॉल करत समुद्रात उडी मारून आत्महत्या, मृतदेहाचा शोध अद्याप सुरुच

वंडर्स पार्कचे मुख्य प्रवेशद्वाराापर्यंत सगळीकडे कचरा पाहायला मिळाला. त्यामुळे सकाळी सफाईकामगारांना मोठी कसरत करावी लागली. नागरीकांनी बेशिस्तीचे दर्शन घडवणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. ज्वेल ऑफ नवी मुंबई, वंडर्स पार्क, वाहन चाचणी केंद्र तसेच विविध मोकळ्या जागा येथे मोठ्याप्रमाणात उशीरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्यामुळे आधीच नवी मुंबई शहरातील प्रदुषणयुक्त हवेमध्ये भर पडल्याने सकाळी चालताना श्वास घेताना त्रास होत असल्याची माहिती नागरीकांनी दिली. रात्री उशीरापर्यंत फटाके वाजवले जात असल्याबद्दल पोलीसांकडूनही कोठे निर्बंध ठेवले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही. तर पालिकेच्या साफसफाई कर्मचारी सुपरवायजर प्रवीण पाटील यांने सांगीतले की आतापर्यंत वंडर्स पार्क व परिसरात फटाक्यांचा एवढा कचरा आतापर्यंत पाहायला नव्हता.परंतू आमच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मेहनतीने सर्व साफसफाई केली.

निर्बंधमुक्तीचे फटाके पहाटेपर्यंत..?

दोन वर्ष करोनाच्या संकटामुळे व निर्बंधामुळे सण, उत्सवावर कडक निर्बंध होते. परंतू संध्याकाळी १० वाजेपर्यंत फटाकेवाजवण्याची मुभा असताना मध्यरात्री तर काही ठिकाणी पङाटेपर्यंत फटाक्यांचे आवाज येत असल्याने पोलीस व्यवस्था काय करत होती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेने स्वच्छतेबाबत खबरदारी म्हणून मुख्य रस्ते व चौक येथील कचरा उचलण्याची विशेष स्वच्छता मोहिम राबवली. पहाटेपर्यंत सफाई कामगार काम करत होते. नवी मुंबईकर नागरीकांनीच स्वयंशिस्त ठेऊन सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मत घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- नवी मुंबई: दिवाळी उत्साहात….पण बेकायदा बॅनरबाजी जोशात

दररोज सकाळी वंडर्स पार्क परिसरात मॉर्निंग वॉक करायला जातो. परंतू लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी वंडर्स पार्कचा सर्व रस्ता फटाक्यांच्या कागदांनी व्यापला होता. सफाईकामगार मेहनतीने सफाई करत होते. फटाके वाजवताना भान न ठेवलेल्यांनी फक्त रस्ता नव्हे तर वंडर्स पार्कच्या प्रवेशद्वाराबाहेरच्या लॉबीवरदेखील फटाके फोडले असून अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या पडलेल्या पाहयला मिळाल्या हे नवी मुंबईकर म्हणून अत्यंत चुकीचे आहे. दोन वर्ष घरात बंद असलेले बेफामपणे सुटले असल्याचे चित्र होते, असे मत नेरुळ से. २१ मधील नागरीक नवीन खंकाळ यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- आजपासून सिडकोचा दिवाळी धमाका; ७ हजार ८४९ घरांची आजपासून विक्री सुरू

करोनापूर्वीच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाला १०५ डेेसिबल आवाज होता.तो यावेळी तो १०९ डेसिबलच्या पुढे गेला होता. मुंबई तसेच नवी मुंबईतही फटाके वाजवण्याची १० पर्यंतची मर्यादा ओलांडून मध्यरात्रीपर्यंत फटाके वाजवले जात होते. त्यावर पोलीसांचे मात्र निर्बंध नसल्याचे पाहायला मिळाले.
सुमैरा अब्दुलअली, आवाज फाऊंडेशन