उरण : रविवारी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासहच्या पहिल्याच पावसाने उरणकरांची तर्धातीरपत उडाली आहे. यात सारडे येथील बेलवाडी व कलंबूसरे गावातील अनेक घरांची छपरे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उरणमधील वातावरण झाकलेले होते. मात्र रविवारी रात्री ११ वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसधार पाऊस सुरू झाला. यावेळी वेगाने आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथील अनेक घरांची छपरे उडाली आहेत. तर सोमवारीही सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे येथील अनेक मार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे येथील जीवन विस्कळीत झाले आहे.
यात कलंबूसरे गावातील ३० ते ३५ घरांचे यामुळे नुकसान झाले आहे. तर सारडे येथील बेलवाडी या आदिवासी पाड्यावरील अनेक घरांची संपूर्ण कौले आणि छप्पर उडाली आहेत. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यात बोकडवीरा गावातील घरांना पाणी साचले आहे. तर उरण शहरातील गणपती चौक,कुंभारवाडा मार्ग,ग्रामीण रुग्णालय मार्ग आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाक्या बंद पडत असल्याने त्या धक्का देत नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर जासई उड्डाणपूलाखालील दोन्ही बाजूच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. तर दुसरीकडे याच पुलाच्या उरण – पनवेल दिशेला जाणाऱ्या मार्गावर ठेवण्यात आलेले मोठे पाईप रस्त्यावर पाणी साचल्याने ते वाहत भर रस्त्यात येऊ लागले होते. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या वाहनाना याचा धोका निर्माण झाला आहे.